राज्यपाल महोदय, १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय लवकर घ्या !
राज्यपाल महोदय, १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय लवकर घ्या !
मुंबई दि. 5 मार्च :
विधानसभा अध्यक्ष निवडीसंदर्भात महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि निवडीसाठी तारीख द्या अशा आशयाचे निवेदन दिले. याच भेटीत राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न गेले वर्षभर प्रलंबित आहे तो सोडवावा याची आठवणही राज्यपालांना करून दिली अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
माध्यम प्रतिनिधींशी बोलताना अजित पवार म्हणाले की, मागील अधिवेशन हे फक्त पाच दिवसाचे होते. आता अर्थसंकल्प अधिवेशन २५ मार्चपर्यंत जाहीर झालेले आहे. या कालावधीत विधानसभा अध्यक्षपद रिक्त ठेवणे योग्य नाही. त्यासाठी एक तारीख द्यावी अशी विनंती केली. गैरवर्तनाबद्दल भाजपच्या बारा आमदारांना एक वर्षासाठी सभागृहाने निलंबित केले होते. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने सहा महिन्याच्यावर सदस्यांना निलंबित ठेवता येत नाही असा निर्णय दिला होता त्या निर्णयाचा आधार घेऊन तशापध्दतीने या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांना नियुक्त न करणे म्हणजे ज्या लोकांचे नेतृत्व ते करतात त्यांच्यावर अन्याय आहे. त्या निकालाचा आधार घेऊन हे नियुक्त प्रकरण संपवा असे राज्यपाल यांना सांगितले.
लोकशाही पध्दतीने ठराव करून दिलेले आहेत. नियमावलीच्या अधीन राहून १२ नावे देण्यात आलेली असल्याचेही त्यांना सांगितले. या दोन गोष्टींवर राज्यपालांनी आम्हाला वेळ दिला असेही अजित पवार म्हणाले.
