राज्यपाल कोश्यारींविरोधात विधिमंडळात जोरदार घोषणाबाजी.
राज्यपाल कोश्यारींविरोधात विधिमंडळात जोरदार घोषणाबाजी.
अभिभाषण केवळ काही मिनिटात आटोपून राज्यपाल परत गेले.
मुंबई, दि. ३ मार्च:
ठाकरे सरकारचे या वर्षातील पहिले अधिवेशन व पहिलाच दिवस वादळी ठरला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आपले अभिभाषण अवघ्या काही मिनिटातच आटोपते घेऊन परत जावे लागले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहात राज्यपाल येताच शिवाजी महाराजांच्या जयजयकारच्या घोषणा देण्यात आल्या. या घोषणाबाजीत राज्यपालांनी भाषणास सुरुवात केली परंतु त्यांनी आटोपते घेतले व ते सभागृहातून परत गेले.
महाविकास आघाडीचे आमदार घोषणा देत असताना त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले मात्र त्यानंतर भाजप आमदारांनीही घोषणा देण्यास सुरुवात केली. या गदारोळात राज्यपाल अभिभाषण सोडून निघून गेले. यावेळी सत्ताधारी व विरोधी पक्ष भाजपा यांच्याकडूनही घोषणाबाजी करण्यात आली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास स्वामी आहेत असे म्हणून वाद ओढवून घेतला होता तर दुसऱ्या एका कार्यक्रमात महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई यांच्याबद्दलही वादग्रस्त विधान केले होते. राज्यपालांच्या या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले होते. विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल यांना आमदारांच्या रोषाला सामारे जावे लागले. राज्यपालांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली.
