नवाब मलिकांचे ओढूनताणून दाऊदशी संबंध जोडण्याचा प्रयत्न !
नवाब मलिकांचे ओढूनताणून दाऊदशी संबंध जोडण्याचा प्रयत्न !
मुंबई दि. 26 फेब्रुवारी :
नवाब मलिक यांनी मुख्यत्यारपत्र घेतलेले सलीम पटेल याच्याशी २००५ मध्ये जमीनीचा व्यवहार केला असताना त्यांचा दाऊदशी संबंध पोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात तथ्य नाही ओढूनताणून नवाब मलिक यांच्यावर आरोप करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जयंत पाटील म्हणाले की, ज्या जमिनीचा संबंध जोडला जात आहे त्या जमीनीचा व्यवहार करताना रितसर स्टॅम्पड्युटी भरली गेली. २००५ मध्ये व्यवहार झाला आणि २००७ मध्ये सलीम पटेल बॉम्बस्फोटात आरोपी होता मग त्या व्यवहाराशी कसा संबंध जोडता ?
त्या जमीनीच्या हरकतीबाबत २०१८ मध्ये जाहिरात देण्यात आली होती. त्यावेळी मुनिरा प्लंबर यांनी कोणतीही हरकत घेतली नाही मात्र २० वर्षानंतर जमीन खरेदीतील पैसे मिळाले नाही म्हणणे कितपत योग्य आहे?
नवाब मलिक यांनी सलीम पटेल यांना मुखत्यारपत्रानुसार पैसे दिल्यावर सलीम पटेल याने मुनिरा प्लंबर यांना पैसे दिले नाही यामध्ये नवाब मलिक यांचा काय दोष, याला जबाबदार सलीम पटेल आहे त्याच्यावर कारवाई करायला हवी. मुनिरा प्लंबर यांनी आरोप केल्यानंतर ओढून ताणून नवाब मलिक यांच्यावर आरोप करुन अडकवण्यात आले आहे हे धक्कादायक आहे. नवाब मलिक यांचा दाऊदशी संबंध नाही. नवाब मलिक हे अनेक वर्ष पक्षात काम करत आहेत. त्यांचा संबंध जोडणे ही निषेधार्ह बाब आहे. राज्यातील जनताही या घटनेचा निषेध करत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
समन्स नसताना अटक करणे योग्य नाही. नवाब मलिक घाबरणारे नेते नाहीत. ईडीला जर माहिती हवी होती तर त्यांनी दिली असती परंतु तसे न करता एका मंत्र्यांला अशा पध्दतीने घरातून उचलून आणणे योग्य नाही. नवाब मलिक यांची बाजू देशासमोर, राज्यासमोर यावी म्हणून यासंदर्भातील माहिती देत असून अधिक मुद्दे वकील मांडतीलच असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
