दहीहंडीचा ‘तो’ थरार या वर्षी नाही!
मुंबई, दि. 6 ऑगस्ट
कोरोनाच्या संकटामुळे यंदा गोविंदा खेळाडूंच्या, मंडळांच्या उत्साहाला विरजण लागले असून हे संकट निसर्गनिर्मित असल्याने सगळ्यांनी संयमाने, स्वत:ची तसेच समाजाची काळजी घेणे फार गरजेचे आहे. दरवर्षी प्रमाणे दहिहंडीचा जल्लोष यावेळी करता येणार नाही तर विविध सामाजिक उपक्रम राबवत हा दहिहंडीचा सण साधेपणाने साजरा करू, असे आवाहन दहिहंडी समन्वय समितीने डिजिटल केले आहे.
यावर्षी अशी साजरी होणार दहिहंडी !
१) यावर्षी दहिहंडी सण हा अगदी साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.
२) महाराष्ट्रातील गोविंदा पथकांना तसे विनंतीपर आवाहन करण्यात आले आहे.
३) गोकुळाष्टमी (कृष्णजन्म) “सामाजिक अंतर” जपणे या नियमाला धरुनच साजरी करणे.
४) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या “रक्ततुटवडा” या सामाजिक समस्येचा विचार करीत गोविंदा मंडळांनी संपूर्ण महाराष्ट्रभर “महारक्तदान” शिबिरे आयोजित करावी असे नम्र विनंतीचे परिपत्रक काढून ते सर्वदूर जाईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
५) महारक्तदाना व्यतिरिक्त इतर समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात यावे अर्थात सामाजिक अंतराचे भान ठेऊनच.
६) दहिहंडी सणाच्या पाठीशी नेहमी उभे राहणारे नेते, पुढारी, राजकीय नेते यांनीही “महारक्तदान” करण्यासाठी जनतेला, युवा तरुणांना आवाहन करावे अशी त्यांना विनंती करण्यात आली आहे.
७) आयोजकांनी यंदा गोविंदा मंडळांच्या पाठीशी उभे राहत त्यांनी हाती घेतलेल्या समाजकार्यात सढळहस्ते मदत करावी हि नम्र विनंती.
८) महारक्तदानाकरिता जिथे जिथे महापालिकेच्या शाळा उपलब्ध करुन देता येतील तिथे तिथे सहकार्य करावे अशा विनंतीचे पत्र माननिय मुख्यमंत्री साहेबांना देण्यात आले आहे.
९) महाराष्ट्र राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली “महारक्तदान” शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे हे सर्वात महत्वाचे.
१०) गोविंदा मंडळांना स्वतंत्ररीत्या शिबिर भरवता येत नसेल तर त्यांनी विभागातील इतर मंडळांना सोबत घेऊन ते कार्य पार पाडावे.
११) दहिहंडी समन्वय समितीचे विशेष प्रतिनिधी / समन्वयक यांच्या तुकड्या याकार्याची आखणी आणि पाहणी करीत आहेत.
