‘हे’ श्रेय फक्त आणि फक्त महाराष्ट्र सैनिकांचे !
‘हे’ श्रेय फक्त आणि फक्त महाराष्ट्र सैनिकांचे !
मुंबई, दि. १३ जानेवारी:
दुकानांवरील मराठी पाट्यांचा निर्णय ठाकरे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला असला. या मुद्द्यावर मनसेचे अध्क्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत याचे श्रेय फक्त मनसे कार्याकर्त्यांचे आहे असे म्हटले आहे.
राज ठाकरे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरंतर आंदोलन करावं लागू नये परंतु २००८ व २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं दुकानावरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेव्हा त्याचं श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच.
महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन. सरकारला मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका. याची अंमलबजावणी नीट करा. यात आणखी एक भानगड सरकारनं करुन ठेवली आहे की, मराठी भाषेशिवाय इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका, असेही राज ठाकरे म्हणाले.
