पिण्याचे पाणी आरक्षित करून सिंचनासाठी नियोजन करा

0
IMG-20220108-WA0086

पिण्याचे पाणी आरक्षित करून सिंचनासाठी नियोजन करा.

नाशिक, दि 9 जानेवारी:
ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पातील गंगापुर, कडवा, पालखेड व ओझरखेड आणि चणकापुर प्रकल्पांमधून सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करतांना स्थानिकांच्या पिण्याचे पाणी आरक्षित करून नियोजन करावे असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्ह्यातील मोठे प्रकल्पांचे 2021-2022 करिता सिंचनाचे नियोजन करणेकामी कालवा सल्लागार समितीच्या आयोजित बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले की, मोठ्या प्रकल्पांमधील 2021-2022 करिता सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करतांना धरण साठ्यात उपलब्ध असणाऱ्या पाणी साठ्यानुसार स्थानिक नागरिकांना 20 ते 25 टक्के पाणी आरक्षित असावे. यासाठी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण विभागाने शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यास स्थानिक नागरिकांच्या पाणी आरक्षणाबाबतचा प्रश्न मार्गी लागणार असून सर्वांना समान न्याय देता येणार आहे. याबरोबरच रब्बी हंगामाचा विचार करून ज्या भागात पाण्याची आवश्यकता जास्त आहे. त्या ठिकाणी शेतीला पाणी देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, अशा सुचनाही पालकमंत्री भुजबळ यांनी संबंधित विभागाला दिल्या.

गंगापुर प्रकल्पाच्या नाशिक डावा तट कालव्यातुन सिंचन व बिगर सिंचनासाठी रब्बी व उन्हाळा हंगामात प्रत्येकी तीन आवर्तने, कडवा प्रकल्पाच्या उजवा कालव्यातुन सिंचन व बिगर सिंचनासाठी एक, उर्ध्व गोदावरी प्रकल्प पालखेड डाव्या तट कालव्यातुन सिंचनासाठी रब्बी हंगामात दोन आवर्तने व बिगर सिंचनासाठी उन्हाळा हंगामात दोन आवर्तने तसेच पालखेड उजव्या तट कालव्यातुन सिंचन व बिगर सिंचनासाठी रब्बी व उन्हाळी हंगामात प्रत्येकी तीन आवर्तने सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

उर्ध्व गोदावरी प्रकल्प ओझरखेड प्रकल्प यामध्ये ओझरखेड व तिसगाव कालव्यातुन सिंचनासाठी रब्बी हंगामात दोन व उन्हाळा हंगामात बिगर सिंचनासाठी एक आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चणकापुर प्रकल्प कालव्यातुन सिंचन व बिगर सिंचनासाठी रब्बी हंगामात एक व उन्हाळा हंगामात मर्यादीत क्षेत्रासाठी एक आवर्तन देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यातील गिरणा धरण प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी योग्य नियोजन केले तर त्या धरणालगत असणाऱ्या एकुण सात गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. यासाठी पाण्याचे नियोजन करतांना पिण्याचे पाणी व या क्षेत्रात असणाऱ्या एमआयडीसी साठी लागणारे पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक आहे. तसेच तळवाडे व दाभाडी या गावांसाठी स्वतंत्र्य पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षणाचे नियोजन करण्यात यावे अशा सुचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित विभागाला दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *