महाराष्ट्रात कुलगुरूपदाचा लिलाव होईल !
महाराष्ट्रात कुलगुरूपदाचा लिलाव होईल !
मुंबई, दि. ५ जानेवारी :
भाजप सरकारच्या कार्यकाळात केलेल्या विद्यापीठ कायद्याचे तामिळनाडूच्या राज्यपालांनी कौतुक केले होते. तामिळनाडूतील विद्यापीठात खूप भ्रष्टाचार पाहिला. कुलगुरूंच्या निवडीसाठी दहा कोटी घेतले जात. भाजपा सरकारच्या कार्यकाळात केलेला विद्यापीठ कायदा जसाच्या तसा तामिळनाडू सरकारने लागू केला. मात्र, आता तोच कायदा बदलला असून येणाऱ्या काळात महाराष्ट्रात कुलगुरूपदाचा लिलाव झाल्याशिवाय राहणार नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
दादर येथील वसंतस्मृती मुंबई भाजपा कार्यालयात भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने आणणेला विद्यापीठ कायदा हा काळा कायदा आहे. त्यावर एक व्यक्ती विद्यापीठाचा, एक राज्यपालाचा आणि तीन व्यक्ती सरकारचे असतील. जेवढ्या नेमणुका महाविकास आघाडी सरकारने केल्या तिथे तिथे भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे.
विद्यापीठे युवासेनेचे अड्डे बनवण्याचे षडयंत्र सुरू आहे. हे पिढ्या बरबाद करण्याचे षडयंत्र आहे. आपण आज लढलो नाही, तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. ज्यावेळी आमची विद्यापीठे विकली जात होती, ती राजकारणाची अड्डे बनत होती, तेव्हा तुम्ही काय करत होतात, असा प्रश्न येणाऱ्या पिढ्या विचारतील. एकीकडे मोदी भ्रष्टाचारमुक्त कारभार करत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार भ्रष्टाचारयुक्त कारभार करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली.
