शंभर वर्षाच्या बीडीडी चाळींवर पहिला हातोडा पडला !
शंभर वर्षाच्या बीडीडी चाळींवर पहिला हातोडा पडला..
मुंबई, दि. ५ जानेवारी:
आशिया खंडातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या व राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरु झाले आहे. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये प्लॉट ब मधील २३ चाळींचा पुनर्विकास करण्यात येत असून उर्वरित प्लॉट अ मधील १९ चाळींचा पुनर्विकास दुसऱ्या टप्प्यामध्ये केला जाणार आहे.
नायगाव बीडीडी चाळीतील पुनर्विकासाचा टप्पा क्रमांक १ अंतर्गत प्लॉट ब मधील २३ चाळींपैकी चाळ क्रमांक ५ बी, ८ बी व २२ बी मधील १७५ गाळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालय विभागास सेवा निवासस्थान म्हणून देण्यात आले होते. या सेवा निवासस्थान गाळ्यांमधील रहिवाशांना नायगांव येथील बॉम्बे डाईंग या संक्रमण शिबिरामधील २२५ चौरस फूट चटई क्षेत्रफळाच्या गाळ्यांचा ताबा म्हाडातर्फे देण्यात आला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयाने येथील १७५ कर्मचाऱ्यांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करून चाळ ५ बी, ८ बी व २२ बी रिक्त करून दिली आहे. निष्कासित रिक्त इमारती पाहून त्या ठिकाणी विक्री योग्य सदनिका बांधल्या जाणार आहेत.
नायगाव बीडीडी चाळीमध्ये तळ अधिक ३ मजल्यांच्या ४२ चाळी अस्तित्वात असून त्यामध्ये एकूण ३ हजार ३४४ रहिवासी राहतात. या प्रकल्पासाठी वास्तूशास्त्रज्ञ सल्लागार व प्रकल्पाचे समन्वयक म्हणून संदीप शिक्रे असोसिएट्सची नियुक्ती केली आहे. तसेच प्रकल्पाचे कंत्राटदार म्हणून एल अॅण्ड टी कन्स्ट्रक्शन कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्लॉट अ मधील चाळ क्रमांक १ अ. १८ अ, १९ अ मधील २२२ पात्र लाभार्थ्यांबाबत पुनर्वसन इमारतीतील कायमस्वरूपी गाळ्याचा क्रमांक संगणकीकृत आज्ञावलीच्या माध्यमातून निश्चित करण्यात आला आहे. ज्या लाभार्थ्यांची पात्रता अद्याप संचालक, बीडीडी यांच्याकडून निश्चित करण्यात आलेली नाही त्या लाभार्थ्यांच्या नावाऐवजी तात्पुरत्या स्वरूपात संचालक, बीडीडी यांच्या नावाची नोंदणी करून गाळेवाटप करण्यात आले आहे.
या प्रकल्पामध्ये ३ बेसमेंट स्टील्ट २२ मजल्यांच्या पुनर्वसन इमारती बांधण्यात येणार आहेत. पुनर्विकासाच्या प्रकल्प अभिन्यासास व पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील इमारतींच्या बांधकामांच्या नकाशांना म्हाडाच्या नियोजन प्राधिकरण कक्षाने मंजुरी दिली आहे.
नायगाव येथील बीडीडी चाळ पाडल्यानंतर रिक्त जागी होणाऱ्या नव्या इमारतींच्या बांधकामामुळे नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याला प्रारंभ होत आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प जलद गतीने पूर्ण करून मार्गी लावला जाईल, असे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
मुंबईतील नायगाव बीडीडी चाळीतील चाळ क्रमांक ५ बी आज निष्कासित करून पाडण्याचे काम सुरु करण्यात आले. त्याठिकाणी नवीन इमारतीच्या बांधकामाला लवकरच प्रारंभ केला जाणार आहे.
बीडीडी चाळींच्या प्रत्येक दगडाला इतिहास असून सामाजिक, सांस्कृतिक चळवळीची साक्ष देणाऱ्या या चाळी आहेत. सुमारे शंभर वर्ष जुन्या या चाळीतील इमारतींच्या पुनर्विकासाद्वारे येथील रहिवाशांना सर्व सुविधायुक्त मोठे घर देऊन त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्याचे अनेक वर्षापासून पाहिलेले स्वप्न नायगाव बीडीडी चाळीतील चाळ क्रमांक ५ बी निष्कासित करून प्रत्यक्षात साकारत आहे.
