अक्कल ज्यांना आहे त्यांच्याच ताब्यात जिल्हा बँक दिली !
अक्कल ज्यांना आहे त्यांच्याच ताब्यात जिल्हा बँक दिली !
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरील विजयानंतर राणेंचा आघाडीवर हल्लाबोल.
मुंबई, दि. ३१ डिसेंबर:
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या चुरसीच्या व अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीचे निकाल सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला धक्का देणारे आहेत. भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंद्धिविनायक पॅनलचे ११ संचालक निवडून आले आहेत तर विरोधी पॅनलचे ८ संचालक निवडून आले.
बँक निवडणुकीच्या विजयानंतर राज्य सरकार टीकास्त्र सोडत नारायण राणे म्हणाले की, विजय मिळवताना अकलेचा वापर झाला, अक्कल ज्यांना आहे त्यांच्या ताब्यात आमच्या देवदेवतांनी जिल्हा बँक दिली आहे. भाजपाची सत्ता आली आहे, माझी नाही. या जिल्ह्यातल्या देवदेवता आणि जनता यांच्या आशीर्वादामुळे ही सत्ता आली आहे. माझे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या सोबत नितेश राणेने घेतलेली मेहनत, त्याला निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली या सगळ्यांनी दिलेली साथ यामुळे हा विजय मिळाला.
आता यानंतरचे लक्ष्य महाराष्ट्रातील सत्तेचे आहे. तिन्ही जिल्ह्यातील विधानसभा व लोकसभेत भारतीय जनता पक्षाचाच सदस्य असेल. नको असलेले चेहरे आमचा जिल्हा लोकप्रतिनिधीपदी ठेवणार नाही. राज्याला मुख्यमंत्री आणि चांगल्या सरकारची गरज आहे. आम्हाला भाजपाचा मुख्यमंत्री हवा आहे, लगानची टीम नको, असे टोला नारायण राणे लगावला आहे.
