गोडसेचे समर्थन ही राष्ट्रद्रोहाची भूमिका !
गोडसेचे समर्थन ही राष्ट्रद्रोहाची भूमिका !
मुंबई, दि. २८ डिसेंबर:
महात्मा गांधींच्या विचारांशिवाय पर्याय नाही. लोकांना भ्रमित करणे, गोडसेचे समर्थन करणे, गोडसेचे मंदिर उभारणे ही सगळी भूमिका राष्ट्रद्रोहाची आहे, असे परखड मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाने ‘गांधीदूत’ अभियानाची सुरुवात केली त्यावेळी नाना पटोले बोलत होते.
नाना पटोले पुढे म्हणाले की, एक नवीन मोहीम आज आम्ही महाराष्ट्रात सादर करत आहोत. लोकांना विखारी विचारांपासून दूर करून वास्तविकता समजावी यासाठी या मोहीमेअंतर्गत काम चालणार आहे. काँग्रेस ही गांधी विचारांची आहे आणि राहणार. महात्मा गांधींच्या विचारांशिवाय पर्याय नाही. ही भूमिका देखील ‘गांधीदूत’च्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.
कालीचरण नावाच्या तथाकथित बाबाने महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले. त्याच्यावर छत्तीसगड सरकारने गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्रातही अकोल्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. विधानसभेत देखील काँग्रेसने भूमिका मांडली की, त्याच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. महात्मा गांधी हे काय एका जाती, धर्माचे नाहीत तर ते संपूर्ण देशाचे आहेत आणि अशा तथाकथित बाबांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द काढला तर त्याचे कायदेशीर परिणाम आगामी काळात त्यांना भोगावे लागतीलच. कालिचर बाबाने माफी मागायची की नाही हा त्याचा भाग आहे पण महात्मा गांधींपेक्षा कोणी मोठा होऊ शकत नाही. महात्मा गांधींचा विचारच देशाला तारू शकतो. असेही पटोले म्हणाले.
