मातोश्रीवरील ‘त्या’ बैठकीत ‘तसे’ ठरलेच नव्हते !
मातोश्रीवरील ‘त्या’ बैठकीत ‘तसे’ ठरलेच नव्हते !
भाजपा नेते अमित शहा यांचा दोन वर्षांनंतर खुलासा..
पुणे, दि. २० डिसेंबर :
भाजपाने २०१९ च्या निवडणुकीवेळी शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही म्हणून शिवसेनेने भाजपाची साथ सोडली असा दावा शिवसेनेकडून करण्यात येत होता पण त्याला दोन वर्षानंतर अमित शहा यांनी उत्तर देत त्या बैठकीत काय घडले हे पुण्यातील सभेत सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे त्या बैठकीतच ठरले होते, असे शहा यांनी स्पष्ट केले.
अमि शहा पुढे म्हणाले की, मुख्यमंत्रिपदावरून मी वचन मोडले असा आरोप केला जातो. विधानसभा निवडणुकीवेळी मी राज्यात आलो होतो. त्यावेळी शिवसेनेबरोबर चर्चा झाली होती. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असे त्यावेळी ठरले होते. मात्र सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाशी तडजोड केली. सत्तेसाठी शिवसेना विरोधकांच्या मांडीवर जाऊन बसली. मी खोटे बोललो होतो असे काहीक्षण गृहीत धरले तर प्रत्येक भाषणात मोदींचे नाव का घेण्यात येते होते. जाहिरात फलकांवर मोदींचे छायाचित्र किती मोठे लावण्यात आले होते हे आठवावे. मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून विश्वासघात केला.
पुण्यातील सभेत शिवसेनेला लक्ष्य करीत अमित शहा यांनी हिंमत असेल तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि भाजपशी दोन हात करा, असे आव्हान दिले. शिवसेनेने भाजपाची साथ सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रसेला बरोबर सरकार स्थापन केले याची सल भारतीय जनता पक्षाला आजही बोचत आहे हे अमित शहा यांच्या पुण्यातील भाषणातून दिसली.
