वकीलीतून केवळ पैसे कमवू नका सामाजिक उत्तरदायित्वही जोपासा !
वकीलीतून केवळ पैसे कमवू नका सामाजिक उत्तरदायित्वही जोपासा !
अमरावती, दि. 20 डिसेंबर :
मूलभूत हक्कांच्या जपणुकीबरोबरच सामाजिक व आर्थिक न्यायाची प्रस्थापना, तसेच जनसामान्यांचे हित साधले जाणे हे संविधानाच्या निर्मात्यांच्या विचारांचे सूत्र होते. मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यांचा मेळ घालणे राज्यघटनेला अभिप्रेत आहे. वकीली हा केवळ उपजिविका किंवा उत्पन्न मिळवण्याचा मार्ग नव्हे, तर सामाजिक उत्तरदायित्वही त्यातून जोपासले गेले पाहिजे. ही जाणीव वकीली व्यवसायात शिरू पाहणा-या विद्यार्थ्यांनी अंगीकारणे आवश्यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितले .
डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचा अमृत महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थी संमेलन व महाविद्यालयाच्या विस्तारित इमारत बांधकामाचे भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई व पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले, त्यावेळी ते बोलत होते.
शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. न्या. विजय आचलिया, न्या. पी. एन. देशमुख, न्या. अनिल किलोर, छत्तीसगडचे माजी महाधिवक्ता जुगलकिशोर गिल्डा, जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश रवींद्र एम. जोशी, लंडन येथील ज्येष्ठ अधिवक्ता साजिद शेख, पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, प्राचार्य डॉ. वर्षा एन. देशमुख आदी उपस्थित होते. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी न्यायमूर्ती गवई, पालकमंत्री ठाकूर, विविध न्यायमूर्ती, अधिवक्ता आदी मान्यवरांचा भावपूर्ण सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला.
न्यायमूर्ती गवई म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शेतकरी, शेतमजूर, जनसामान्यांच्या केसेस लढून त्यांना न्याय मिळवून दिला. त्यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. त्यांनी स्थापलेल्या महाविद्यालयामुळेच या भूमीतील अनेक विद्यार्थी उच्च पदापर्यंत पोहोचू शकले. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भाऊसाहेब या दोहोंचे ध्येय एकच होते. गोरगरीब, वंचित, जनसामान्यांचे उन्नयन हे त्यांचे स्वप्न होते व त्यासाठी त्यांनी आजीवन कार्य केले. दोहोंनीही महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरू मानून त्यांच्यापासून प्रेरणा घेतली.
शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देणे हे घटनाकारांना अभिप्रेत आहे. त्यामुळे अधिवक्ता म्हणून कार्य करत असताना प्रत्येकाने सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जोपासली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
