सार्वजनिक आस्थापनांमध्ये प्रवेशासाठी लसीकरण बंधनकारक:
मुंबई, दि. 16 डिसेंबर:
जिल्ह्यातील लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता 23 डिसेंबर पासून सर्व सार्वजनिक आस्थापनांमध्ये प्रवेशासाठी लसीकरण बंधनकारक करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित आस्थापना प्रमुखांवर निश्चित करण्यात यावी, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोविड सद्यस्थिती बाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते.
छगन भुजबळ म्हणाले, ओमायक्रॉन विषाणूचा धोका कमी असला तरी त्याचा प्रसार झपाट्याने होत असतो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लसीकरणाची गती वाढविण्यात येणार आहे. तसेच ज्यांचा पहिला डोस झाला आहे त्यांना दुसऱ्या डोस देण्यासाठी नियोजन करण्यात यावे. प्रशासकीय यंत्रणासोबतच नागरिकांनीही जबाबदारीने आपले लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये कोरोना व ओमायक्रॉनच्या धर्तीवर संबंधितांनी आवश्यक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.
कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्याला देण्यात आलेल्या ऑक्सिजन लक्ष्यांकाच्या तुलनेत आजच्या स्थितीत जिल्ह्यात 378 मेट्रीक टन एवढा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे व विविध मार्गाने तो सातशे मेट्रिक टन होऊन देखील अधिक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ओमायक्रॉन विषाणूच्या प्रसाराची गती अधिक असल्याने त्याच्या तपासणीसाठी आरोग्य यंत्रणेने टेस्टिंग करण्यासाठी दहा हजार तपासणी किटस् खरेदी करावेत, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विमान तळावर सुरक्षेच्या दृष्टिने प्रशासनाकडून व्यवस्था उभी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर 0.8 टक्के, मृत्यूदर 2.11 टक्के आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहितीही यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली. पहिला डोस घेऊन दुसरा डोस न घेतलेल्या लोकांचा शोध घेऊन ही दरी लवकरात लवकर दूर करण्याच्या दृष्टीने सर्व विभाग काम करतील, असेही मांढरे यांनी नमूद केले.
बैठकीच्या सुरूवातीला 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलान यशस्वीपणे पार पाडले, यासाठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सर्व प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांचा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रशासकीय यंत्रणांनी केलेले सहकार्य देखील मोलाचे आहे, असे कौतुकही पालकमंत्री भुजबळ यांनी केले.
Leave a Comment