मुंबई महापालिकेत रिपाइंचे किमान 25 नगरसेवक निवडून आणा
मुंबई महापालिकेत रिपाइंचे किमान 25 नगरसेवक निवडून आणा..
मुंबई दि. 10 डिसेंबर :
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे किमान 25 नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार करून कामाला लागण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले.विक्रोळी येथे ईशान्य मुंबई जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात आठवले बोलत होते.
ईशान्य मुंबईत 1992 च्या पालिका निवडणुकीत 7 नगरसेवक रिपाइंचे निवडून आले होते तर संपूर्ण मुंबईत रिपाइं चे 12 नगरसेवक निवडून आले होते. रिपब्लिकन पक्ष आता केवळ बौद्धांचा आणि एका जातीचा राहिला नसून सर्व जाती धर्मियांचा पक्ष झाला आहे. संपूर्ण देशात रिपब्लीकन पक्ष पोहोचला आहे. झोडपट्टीवासीयांचे, गरिबांचे नोकरीचे, घराचे प्रश्न रिपब्लिकन पक्ष सोडविण्यात अग्रेसर आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजप आरपीआय युती होणार असून सत्ता आल्यास पहिली अडीच वर्षे रिपाइंचा उपमहापौर तर भाजपचा महापौर होईल. तसेच नंतरची अडीच वर्षे रिपाइंचा महापौर होईल असे भाजप सोबत ठरले असल्याचे रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केले.
मुंबईतील उत्तर भारतीयांच्या संकटात रिपब्लिकन पक्ष उत्तर भारतीयांच्या पाठीशी नेहमी उभा राहिला आहे. उत्तर भररियांचे रोजगार, घर आदी सर्व प्रश्नांवर नेहमी रिपब्लिकन पक्षाचे संघर्षनायक ना रामदास आठवले यांनी उत्तर भारतीयांना साथ दिली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आरपीआय युती होणार असून आरपीआय उत्तर भारतीयांनाही मुंबई मनपा निवडणुकीची उमेदवारी देणार असल्याची घोषणा रामदास आठवले यांनी केली असल्यामुळे येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांनी रिपब्लिकन पक्षाला साथ द्यावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला यांनी केले.
यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर;मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; आयोजक स्थानिक जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड; श्रीकांत भालेराव; डी एम चव्हाण; मुस्ताक बाबा; योगेश शिलवंत; राजेश सरकार; विलास तायडे;सुमित वजाळे; जयंतीभाई गडा; साहेबराव सुरवाडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
