राज्यात ५०५१ कोटींचे गुंतवणूक करार
राज्यात ५०५१ कोटींचे गुंतवणूक करार..
मुंबई, दि. 8 डिसेंबर :
दुबई वर्ल्ड एक्स्पोच्या अभूतपूर्व यशानंतर उद्योग विभागाने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा वेग कायम ठेवला असून विविध १२ कंपन्यांसोबत सुमारे ५०५१ कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. या निमित्ताने मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० या उपक्रमांतर्गत एकूण १.८८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करून ३ लाख ३४ हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध करण्यात राज्य यशस्वी ठरल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
आज झालेल्या १२ सामंजस्य करारातून राज्यात ९००० पेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण होतील. गुंतवणूक करार पूर्णत्वास येण्यासाठी उद्योग विभागाने कंबर कसली आहे. या गुंतवणुकीद्वारे राज्यांचा सर्वांगिण औद्योगिक विकास साधण्यात येणार आहे. या करारातून संरक्षण, अंतराळ संशोधन, माहिती तंत्रज्ञान, जैव-इंधन, इलेक्ट्रीक वाहन निर्मिती, निर्यात प्रधान उद्योग, अन्न प्रक्रिया, स्टील, इथेनॉल, औषध निर्माण आदी क्षेत्राला चालना मिळणार आहे. या गुंतवणूकदारांमध्ये ग्रासिम इंडस्ट्रिज, सोलार एव्हीएशन, पद्मावती पेपर्स, देश अग्रो, डी डेकॉर या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.
अनेक दशकांपासून महाराष्ट्र राज्य औद्योगिकरणात आघाडीवर आहे. राज्याने आपल्या पायाभूत सुविधांचा वेग वाढविला असून शासनाच्या कृतिशील धोरणामुळे आणि प्रगतीशील दृष्टिकोनामुळे कोरोना काळातही राज्यात औद्योगिक गुंतवणूकीचा ओघ सतत वाढता ठेवला आहे, असे देसाई म्हणाले.
या सामंजस्य कराराच्या निमित्ताने राज्यात धोरणात्मक गुंतवणूकीद्वारे रोजगाराच्या संधींना बळकटी देण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना यश येत असून त्यात सातत्य ठेवण्याचा उद्योग विभागाचा प्रयत्न असल्याचे देसाई यांनी सांगितले.
