२६/११ च्या हल्यातील जवानांचे हौतात्म्य व त्याग कायम स्मरणात राहिल
२६/११ च्या हल्यातील जवानांचे हौतात्म्य व त्याग कायम स्मरणात राहिल…
मुंबई, दि. २६ नोव्हेंबर:
मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी सर्वच सुरक्षा दलांनी असामान्य धैर्य, शौर्य व पराक्रमाचे दर्शन घडवले व दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावले. २६/११ हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या वीरांच्या त्यागाला, शौर्याला, देशभक्तीला तोड नाही. प्रत्येक भारतवासी या शहीदवीरांच्या त्यागाबद्दल कृतज्ञ राहिल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहिदांचे स्मरण करुन कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांनाही श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या.
मुंबईच्या रक्षणासाठी पोलिस दलातील प्रत्येक अधिकारी, जवान स्वयंप्रेरणेने रस्त्यावर उतरला. जीवाची जोखीम पत्करुन कर्तव्यनिष्ठेने दहशतवाद्यांचा मुकाबला केला. हुतात्मा तुकाराम ओंबळेसारख्या वीराने शरीरावर गोळ्या झेलून दहशवादी कसाबला जिवंत पकडून दिले. मुंबई पोलिसांच्या या कामगिरीला जगाच्या इतिहासात तोड नाही. मुंबई पोलिसांनी देशरक्षणासाठी बजावलेले कर्तव्य, केलेला त्याग देशवासियांच्या कायम स्मरणात राहिल. मुंबई पोलिसांचे हौतात्म्य भावी पिढीला देशसेवेची, कर्तव्याची जाणीव करुन देईल.
दहशतवादी हल्ल्यावेळी मुंबई पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून लढताना सैन्यदल, राष्ट्रीय सुरक्षा दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, भारतीय रेल्वे, आरोग्य सेवेचे डॉक्टर-कर्मचारी, ताजमहल व ट्रायडंट हॉटेलचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासह शहरातील नागरिकांनीही देशभक्ती, साहस, मानवतेचे अलौकिक दर्शन घडवले. या सर्वांच्या कामगिरीचे स्मरण करुन त्यांच्या कर्तव्य निष्ठेबद्दलही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
