राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार
राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार..
मुंबई, दि. २५ नोव्हेंबर
कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा गजबजणार असून आता १ डिसेंबरपासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पाचवीपासूनचे पुढचे वर्ग आधीच सुरू असल्याने आता राज्यातल्या सर्व शाळा सुरू होणार आहेत अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीनंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात पहिलीपासून बारावीपर्यंत सर्व वर्गांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. या वर्गांसाठी लागू करावयाच्या नियमावलीबाबत टास्क फोर्ससोबत चर्चा केली जाईल. विद्यार्थ्यांच्या पालकांशी, शिक्षकांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण वातावरण कसे दिले जाईल, याची काळजी घेतली जाईल.
विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती केली जाणार नाही. आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय मात्र तूर्त ऐच्छिक असणार आहे. कोविड-१९ संबंधित खबरदारीचे उपाय आणि एसओपी लवकरच जारी करण्यात येतील. राज्यात कोविड रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. परिणामी परिस्थिती सामान्य होत असल्याने राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करत आणले आहेत.
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण होईपर्यंत नियम व अटी पाळून शाळा सुरू करता येऊ शकतील, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच १२ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याबाबत टास्क फोर्सने सकारात्मक शिफारसी दिल्या आहेत.
