काँग्रेसचा ‘शेतकरी विजय दिवस’ राज्यभर धडाक्यात साजरा
काँग्रेसचा ‘शेतकरी विजय दिवस’ राज्यभर धडाक्यात साजरा
पंतप्रधानांनी देशातील जनतेचा विश्वास गमावला!: नसीम खान.
मुंबई, दि. २१ नोव्हेंबर :
शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे तीन काळे कृषी कायदे केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले हा शेतकऱ्यांच्या त्यागाचा, बलिदानाचा, त्यांनी वर्षभर केलेल्या संघर्षाचा विजय आहे. पंतप्रधानांनी कायदे मागे घेत असल्याचे जाहीर करुनही जोपर्यंत संसदेत निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकरी त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही हा पंतप्रधानांनी शेतकरी व जनतेचा विश्वास गमावल्याचे द्योतक आहे, असे माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने तीन काळे कृषी कायदे मागे घेतल्यानंतर प्रदेश काँग्रेसने आज राज्यभर ‘किसान विजय दिवस’ साजरा केला. मुंबईत टिळक भवन येथे फटाके वाजवून व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, मुनाफ हकीम, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, राजेश शर्मा, प्रमोद मोरे, रमेश शेट्टी, सचिव राजाराम देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नसीम खान म्हणाले की, या आंदोलनात काँग्रेस पक्ष पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. खा. राहुलजी गांधी यांनी रस्त्यावर उतरुनही या संघर्षात सहभाग घेतला. पहिल्या दिवसापासून राहुल गांधी यांनी, हे कायदे सरकारला मागे घ्यावे लागतील अशी परखड भूमिका मांडली होती आणि मोदी सरकारला अखेर हे जुलमी कायदे मागे घ्यावेच लागले. राहुलजी गांधी यांचे आधीच ऐकले असते तर ७०० शेतकऱ्यांचा नाहक बळी गेला नसता व आर्थिक नुकसानही झाले नसते. महाराष्ट्रातही शेतकरी आंदोलनात काँग्रेस पक्षाने भक्कम साथ दिली. हे काळे कायदे रद्द करावेत यासाठी शेतकरी मेळावे, ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. राज्यातून ६० लाख सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नक्षलवादी, देशद्रोही, खलिस्तानी, आंदोलनजीवी म्हणून अपमानित करण्यात आले. त्यांच्यावर अत्याचार केले गेले, दिल्लीत येऊ नये म्हणून रस्त्यावर मोठे खिळे ठोकले, भिंती उभ्या केल्या पण शेवटी शेतकरी एकजुटीपुढे केंद्र सरकारला झुकावे लागले. शेतकऱ्यांचा केलेला अपमान जनता कधीही विसरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय देशाला खड्यात घालणारा निघाला. नोटबंदी, कोरोना व काळे कृषी कायदे हे घातक ठरतली हे राहुल गांधी यांनी जाहीरपणे सांगितले होते पण त्याकडे लक्ष देण्याऐवजी त्यांची खिल्ली उडवण्यात आली. भाजपाचा हा अहंकार, मनमानीपणा हा देशातील जनतेच्या मुळावर उठला असून त्यात नुकसान जनतेचे होत आहे असे नसीम खान म्हणाले.
पुणे येथे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, रमेश बागवे, उल्हास पवार यांनी सहभाग घेतला. नाशिक, सोलापूर, नागपूर, अमरावती, पनवेल, परभणी, लातूर, नांदेडसह राज्यातील सर्व जिल्हा, तालुक्यातही काँग्रेस पदाधिकारी यांनी जल्लोष करुव किसान विजय दिवस साजरा केला.
