…म्हणून राष्ट्रवादी व शिवसेनेकडून समीर वानखेडे टार्गेट!
…म्हणून राष्ट्रवादी व शिवसेनेकडून समीर वानखेडे टार्गेट!
मुंबई, दि. 6 नोव्हेंबर :
राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही, एसटी कामगारांच्या गंभीर समस्या, महिलांवरील वाढते अत्याचार अशा समस्यांकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडून दररोज समीर वानखेडे यांना टार्गेट करण्यात येत आहे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
एखाद्या अधिकाऱ्याची आई, पत्नी किंवा वडील यांच्यावर सतत टीका करणे समजण्यापलिकडचे आहे. आपली सर्व संबंधितांना विनंती आहे की, हा प्रकार थांबवा आणि तपासी यंत्रणांना त्यांचे काम करू द्या. गुन्ह्यात तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला धारेवर धरले की मूळ अंमली पदार्थांचा आणि गुन्ह्यावरील कारवाईचा विषय बाजूला राहतो, असे ते म्हणाले.
नवाब मलिक हे राज्याचे मंत्री आहेत व त्यांना अधिकार आहेत. एखाद्या व्यक्तीच्या विरोधात काही असेल तर चौकशी करून शिक्षा करा. पण एखाद्या अधिकाऱ्याला सतत इतके धारेवर धरावे का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. केवळ नवाब मलिक यांच्या जावयाला अटक केली म्हणून वानखेडे यांना धारेवर धरले, असे प्रकरण दिसत नाही. याचे धागेदोरे अनेक वर्षापूर्वीचे असावेत आणि जुने हिशेब चुकते करणे चालू असावे, असा अंदाज आहे.
