देशमुखांची अटक राजकीय सूडातून व आघाडीच्या नेत्यांना घाबरविण्यासाठी !
देशमुखांची अटक राजकीय सूडातून व आघाडीच्या नेत्यांना घाबरविण्यासाठी !
मुंबई, दि. २ नोव्हेंबर :
माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात स्वतःहून उपस्थित राहिले. त्याआधी त्यांनी सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब केला. अनिल देशमुख यांना देखील फसवले गेले आहे. त्यांच्यावर ज्या व्यक्तीने आरोप लावले, तो व्यक्ती फरार आहे आणि आरोप असलेले व्यक्ती स्वतःहून चौकशीला गेले तर त्यांना अटक करण्यात आले. ही कारवाई राजकीय सूडातून आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना घाबरविण्यासाठी केली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.
भाजपच्या नेत्यांने काल ट्विट केले की, पुढचा नंबर अनिल परब यांचा आहे. याचा अर्थ सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. अनिल देशमुख यांना अटक केली असली तरी कायदा आपले काम करेल. एक ना एक दिवस सत्य लोकांसमोर येईलच. मात्र परमबीरसिंह कुठे आहेत? याचे उत्तर केंद्रसरकारने दिले पाहीजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.
परमबीर सिंह हे महाराष्ट्रातून चंदीगढ येथे गेले. त्यानंतर ते परतले नाहीत. काही लोक सांगतात ते परदेशात गेले आहेत. लुकआऊट नोटीस असतानाही कोणताही व्यक्ती देश सोडून कसा जाऊ शकतो? एकतर हवाई मार्गे किंवा रस्ते मार्गाने जावे लागेल. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार या तीन राज्यांतून नेपाळला जाता येते. या तीनही राज्यात भाजपचे सरकार आहे. इतर लोकांप्रमाणे परमबीर सिंह यांना पळून जाण्यास मदत करण्यात आली आहे का? याचे उत्तर भाजपला द्यावे लागेल असेही नवाब मलिक म्हणाले.
