मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची राष्ट्रपतींकडे तक्रार करणार
मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची राष्ट्रपतींकडे तक्रार करणार..
मुंबई दि. १ नोव्हेंबर :
मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी समीर दाऊद वानखेडे याची भेट घेऊन ज्या पध्दतीने मिडिया ट्रायल केली यावरुन अनेक प्रश्न निर्माण होत असून वैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला एवढी घाई का आहे? ते असे वर्तन का करत आहेत असे अनेक सवाल करतानाच या सगळ्या प्रकाराची राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशाचे मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी समीर दाऊद वानखेडे यांनी धर्म बदलला नाही असे वक्तव्य माध्यमातून केले आहे. वैधानिक पदावर व्यक्ती ज्याच्यावर प्रश्न निर्माण होत आहे तो मुसलमान असताना फर्जीवाडा करुन मागासवर्गीय प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवली. अरुण हलदर हे त्यांच्या घरी जातात कागदपत्रांची तपासणी करतात आणि क्लीनचिट देतात हे कोणत्या अधिकारात बसते असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
दुसरीकडे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी समीर दाऊद वानखेडे यांची बाजू घेत समर्थन केले हे दुर्दैवी आहे. हलदर हे भाजपाचे नेते आहेत मान्य आहे परंतु त्यांना जे पद मिळाले आहे त्या पदाची जबाबदारी आणि कार्य व कर्तव्य काय आहे. आयोगाची कार्यप्रणाली कशी आहे. ज्या पदावर बसलो आहे त्या पदाचे वर्तन कसे हवे हे समजले पाहिजे असा जोरदार टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.
अरुण हलदर हे मर्यादेचे उल्लंघन करत आहेत. मुळात ज्याच्यावर अन्याय झाला आहे तो व्यक्ती या आयोगाकडे तक्रार दाखल करतो.त्यानुसार आयोग रिपोर्ट करुन संबंधित व्यक्ती व संस्था यांना समन्स पाठवतात त्याची चौकशी करुन तो रिपोर्ट संसदेच्या पटलावर ठेवला जातो त्यामुळे माहिती घेण्याचा किंवा त्याची तपासणी करण्याचा अधिकार मागासवर्गीय आयोगाला नाही असेही नवाब मलिक म्हणाले.
देशात के. रामास्वामी जे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते त्यांनी देशात जातीच्या दाखल्याचे बोगस प्रकरणे मोठ्या प्रमाणावर बाहेर येऊ लागल्यावर सन १९९४ मध्ये देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात जातपडताळणी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.
मला अट्रोसिटी कायद्यांतर्गत आत टाकण्याची धमकी समीर वानखेडे याने दिली आहे. जो व्यक्ती दलितच नाही. तो धमकी देत आहे. तो जरा जास्तच बोलत आहे. सर्व व्यक्तींनी आपल्या मर्यादेत राहिले पाहिजे. आपल्या पदाची गरीमा सांभाळली पाहिजे असे सांगतानाच दुसर्याच्या अधिकाराचे हनन करण्याचा अधिकार नाही याचीही तक्रार करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी नको त्या गोष्टींवर चर्चा केली. खोटं बोलायचं असेल तर ढंगात बोला जेणेकरून लोकांच्या लक्षात येईल. आजपण मी माझ्या वक्तव्यावर कायम आहे. फर्जीवाडा करुन समीर दाऊद वानखेडे याने सर्टिफिकेट बनवले. त्याचे सर्टिफिकेट मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारने चौकशी समिती स्थापन केली असून या समितीसमोर माझे म्हणणे मांडणार आहे. या समितीसमोर जो फर्जीवाडा झालाय त्यावर चौकशीनंतर शिक्कामोर्तब होणार आहे. एकदा शिक्कामोर्तब झाल्यावर कायद्यानुसार कारवाई होईल असेही नवाब मलिक म्हणाले.
