नुकसानभरपाई दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा

0
IMG-20211031-WA0032

नुकसानभरपाई दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा

नाशिक, दि. 31 ऑक्टोबर:
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ४१ कोटी रुपयांची मदत प्राप्त झाली असून दिवाळीच्या आत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून लाखांचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

येवला कृषी उत्पन्न बाजार समिती, अदरसुल उपबाजार येथील नूतन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

पालकमंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, कोरोनामुळे गेले दोन वर्षे कामांना अडचणी होत्या. त्या आता दूर झाल्यापासून कामांना पुन्हा एकदा गतीने सुरुवात झाली आहे. परंतु कोरोना अद्याप संपलेला नाही त्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलली जात आहेत. नागरिकांनीही योग्य खबरदारी घेवून सहकार्य करावे. कोरोनाच्या काळात अन्न, धान्याची कमतरता आपण पडू दिली नाही यासाठी माथाडी कामगारांनी महत्वाची भूमिका बजावली.

बाजार समितीत जमा होणारा महसूल हा विकासासाठी व शेतकरी हितासाठी खर्च करण्यात यावा. उत्तम पद्धतीने महसूल गोळा करावा आणि उदारमनाने शेतकऱ्यांसाठी खर्च करावा. सर्वांना अतिशय जागरूक राहून काम करण्याची आवश्यकता आहे. जीएसटीची मोठी रक्कम केंद्र सरकारकडे जमा होत असून राज्याच्या हिश्याची येणे असलेली रक्कम राज्य शासनास केंद्र सरकारकडून मिळेल तेव्हा मिळेल परंतु त्यातूनही मार्ग काढत विकास कामे केली जात आहेत, व भविष्यातही शासन करत राहील असे सांगून शेतकरी कष्टकरी व नागरिकांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *