गुणवान विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार
गुणवान विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार
पुणे, दि. 30 ऑक्टोबर
राज्याचा सामाजिक न्याय विभाग अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून गुणवान विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठ विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.
सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित यूपीएससी व एमपीएससी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमाप्रसंगी धनंजय मुंडे बोलत होते.
बार्टीच्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन युपीएससी व एमपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवलेले विद्यार्थी निश्चितच कौतुकास्पद असून सर्व विद्यार्थ्यांचे विभागाच्यावतीने अभिनंदन करतो.त्यांनी मिळवलेले यश हे समाजातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. भविष्यात देशभरात अधिकारी म्हणून उच्च पदावर काम करताना देशाच्या हितासाठी आपण योगदान देऊ शकलो तर आपल्या कामाचे चीज झाले असे समजा, असा कानमंत्र धनंजय मुंडे यांनी उपस्थित भावी अधिकाऱ्यांना दिला.
शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात असले तरी जागतिकीकरणाच्या युगात झालेल्या प्रचंड स्पर्धेत आपल्या देशाचे- राज्याचे विद्यार्थी कुठेही कमी नाहीत, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे कोणाची संधी हिरावून घेतली जाता कामा नये हे देखील महत्वाचे असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगून सर्व गुणवान विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती हेच विभागाचे लक्ष असल्याचे नमूद केले.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्यासह केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेले तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याने पुण्यात पालकमंत्री अजितदादा पवार तसेच खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक दर्जाच्या सोयी – सुविधा असलेले मुला-मुलींचे वसतीगृह त्याचबरोबर जागतिक स्तरावरील संशोधन केंद्र निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली.
नासामध्ये शिक्षण घेत असलेल्या तेजस्विनी शिंदे या विद्यार्थिनीचे उदाहरण देत निश्चितच असे विद्यार्थी पुढे देशाचे व राज्याचे नाव उज्वल करतील अशी आशा धनंजय मुंडे यांनी शेवटी बोलताना व्यक्त केली.
