वानखेडे, नवाब मलिक प्रकरणात भाजपाचे काय काम ?
वानखेडे, नवाब मलिक प्रकरणात भाजपाचे काय काम ?
रत्नागिरी दि. २९ ऑक्टोबर :
समीर वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावर राज्यातील सामान्य माणसाला निर्माण झालेली शंका किंवा आर्यन खान यांच्या कारवाईतील नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीत सर्व काही उघड झाले आहे. यात समीर वानखेडे आणि नवाब मलिक आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडतील. यामध्ये पडून भाजपाने त्यांचा कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे .
जयंत पाटील म्हणाले की, भाजपाने एका अधिकाऱ्याच्या बाबतीत एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नाही. नवाब मलिक माहिती उघड करत आहेत त्याला समीर वानखेडे उत्तर देतील. भारतात १२० कोटी लोकसंख्या असतानाही केंद्रीय यंत्रणेला केवळ महाराष्ट्रातील आणि त्यांच्याविरोधी बोलणारे त्यातही केवळ राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षातील नेते दिसत आहेत. बाकी पक्षातील नेते हे धुतल्या तांदळासारखे आहेत. भाजपमधील खासदारच सांगतात की, आता आम्हाला रात्रीची शांत झोप लागते. म्हणजेच भाजपात तुम्ही गेलात की सगळ्याला अभय आहे. परंतु विरोधात आवाज उठवला की त्यांची दहा-वीस वर्षांपूर्वीची कागदं काढायची आणि चौकशीचा ससेमिरा सुरु करायचा, रेड टाकायची, त्यांची बदनामी करण्याचे काम केंद्रीय यंत्रणा करतेय हे दुर्दैव आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज्य सरकारवर टिका करत आहेत मात्र त्यांना इतकं महत्त्व देण जरुरी नाही. चंद्रकांत पाटील हल्ली झोपेतही बोलतात असे कानावर आलं आहे त्यामुळे त्यांचे बोलणे जास्त मनावर घेऊ नका असेही पाटील म्हणाले.
