कृषी तंत्रज्ञान शिक्षण मराठी भाषेतून देण्याची गरज
कृषी तंत्रज्ञान शिक्षण मराठी भाषेतून देण्याची गरज
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पस्तीसावा दीक्षांत समारंभ
अहमदनगर, दि. 29 ऑक्टोबर :
कोवीड काळात सर्व उद्योग बंद असतांना या देशाला तारण्याचे काम देशाच्या शेती क्षेत्राने केले आहे. शेतीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असून त्याचबरोबर कृषी व तंत्रज्ञान या विषयांचे शिक्षण मराठी भाषेतून देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पस्तीसावा पदवी प्रदान (दीक्षांत) समारंभ पार पडला. त्यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी स्नातकांना अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन केले.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये उत्कृष्ट दर्जाचे संशोधनाचे काम होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करत नावीन्यपूर्ण काम झाले आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक वृत्ती ठेवत काम केल्यास देशाची विकासाकडे वाटचाल होईल. तसेच कृषी विद्यापीठांनी मातृभाषेचा सन्मान करत कृषी व तंत्रज्ञानाचे शिक्षण व कामकाज मराठी भाषेतून करण्यावर भर द्यावा. कृषी विद्यापीठांनी अधिकाधिक पेटंट प्राप्त करावेत. सेंद्रिय व जीआय तंत्रज्ञानावर आधारित शेती व्हावी. यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे ही कोश्यारी यांनी सांगितले.
