लोकांच्या अडचणी सोडवा लोकं तुम्हालाच प्राधान्य देतील
लोकांच्या अडचणी सोडवा लोकं तुम्हालाच प्राधान्य देतील
गुहागर दि. २८ ऑक्टोबर :
येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यासाठी आपल्याला आपले सैन्य तयार ठेवायला हवे. लोकांच्या अडचणी सोडवा लोकं तुम्हालाच प्राधान्य देतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गुहागर येथे व्यक्त केला.
गुहागर मतदारसंघातील लोकांच्या आशा – आकांक्षा काय आहेत हे जाणून घेतले…त्यांचे आरोग्य आणि सुख-सुविधांबाबतचे प्रश्न जाणून घेतले आहेत… खासदार सुनिल तटकरे त्यांच्या पद्धतीने यामध्ये लक्ष घालतील तर मी शासन दरबारी या गोष्टी मांडेन असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.
या मतदारसंघात आपला पराभव झाला असला तरी आपली मतांची टक्केवारी येथे वाढली आहे. थोडीशी मेहनत केली तर इथे आपल्या बाजूने निकाल लागू शकतो. आपण थोडी संघटना टाईट केली तर आपला विजय इथे निश्चित आहे असा विश्वासही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण केला.
इथे कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे. अजितदादा, सुनील तटकरे हे कुणबी समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, नव्या योजनाही या समाजासाठी आणत आहेत. पवारसाहेब सर्वात उत्तुंग व्यक्तीमत्व आहे तर आपला पक्षही तितकाच मोठा व्हायला हवा. त्यादृष्टीने आपल्याला कामाला लागायचे आहे असे आत्मविश्वास निर्माण करणारे मार्गदर्शन जयंत पाटील यांनी केले.
मधल्या काळात काही लोक सोडून गेल्याने एक पोकळी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र गुहागरमधील कार्यकर्त्यांचा उत्साह दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रदेशाध्यक्ष यांनी केलेल्या सुचनेनुसार आम्ही इथे संघटन तयार केले आहे. पवारसाहेबांवर श्रद्धा असलेले लोक आजही पक्षासोबत आहेत. येत्या काळात कला – क्रिडा संस्कृती व पर्यटन या सर्वदृष्टीने या भागाचा विकास करण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करू तसेच लोकांच्या मनात स्थान निर्माण करू आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या तालुक्यात चांगले दिवस येतील असा विश्वास खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
यावेळी खासदार सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार शेखर निकम, माजी आमदार संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, निरीक्षक बबन कनावजे, सहदेव बेटकर, शंकरराव कांगणे, जिल्हा उपाध्यक्ष पद्माशेठ आरेकर, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, महिला निरीक्षक संगीता साळुंखे, तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर, महिला तालुकाध्यक्षा स्नेहा भागडे, गुहागर विधानसभा अध्यक्ष राजेंद्र आंबरे, संदीप राजपुरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
