पेगॅससद्वारे भारतीय लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न !
पेगॅससद्वारे भारतीय लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न !
नवी दिल्ली, दि. २७ ऑक्टोबर :
पेगॅसस हेरगिरी प्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी समिती नेमण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते खा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पेगॅसस भारतात कोणी आणले ? असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित करत पेगॅससद्वारे भारतीय लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न केल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी म्हणाले की, पेगाससद्वारे भारतीय लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे म्हटले आहे. मला विश्वास आहे की यातून सत्य बाहेर येईल. संसदेच्या अधिवेशनात आम्ही पेगाससचा मुद्दा उपस्थित केला होता. आज आम्ही जे म्हणत होतो त्याचे न्यायालयाने समर्थन केले आहे. आम्ही ३ प्रश्न विचारत होतो, पेगॅससला कोणी अधिकृत केले? ते कोणाच्या विरोधात वापरले गेले आणि इतर देशांना आपल्या लोकांची माहिती मिळाली का? मात्र यावर आम्हाला उत्तर मिळाले नाही.
पेगॅससचा वापर मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान, भाजपा मंत्र्यांसह इतरांविरोधात केला गेला. पंतप्रधान आणि गृहमंत्री पेगॅसस वापरून डेटा मिळवत होते का? निवडणूक आयोग, सीईसी आणि विरोधी पक्षनेत्यांच्या फोन टॅपिंगचा डेटा पंतप्रधानांकडे जात असेल तर ते गुन्हेगारी कृत्य आहे. हा मुद्दा आम्ही पुन्हा संसदेत मांडू. संसदेत चर्चा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे राहुल गांधी म्हणाले.
