ईडी, सीबीआय, आयटी कमी पडल्यामुळे एनसीबी ॲक्टीव झालेली दिसते
ईडी, सीबीआय, आयटी कमी पडल्यामुळे एनसीबी ॲक्टीव झालेली दिसते
ठाणे दि. २५ ऑक्टोबर :
बॉलिवूड आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे हे एक षडयंत्र आहे. ईडी, सीबीआय, आयटी या यंत्रणा कमी पडल्यामुळे आता एनसीबी ॲक्टीव झालेली दिसते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना पाटील पुढे म्हणाले की, क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी पंच प्रभाकर साहील याने एनसीबी व समीर वानखेडे यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे हे सर्व धक्कादायक आहे. नवाब मलिक यांनी पुराव्यासहीत एनसीबी आणि समीर वानखेडे यांचे प्रकरण समोर आणले असून एकंदरीत हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणी योग्य ती पावले टाकली जातील
महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा पूर्ण प्रयत्न झाला मग शेवटी सरकार पडत नाही म्हटल्यावर सरकार व मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आणि त्यातलाच आर्यन खान प्रकरण असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
आर्यन खान प्रकरण बोगस प्रकरण असल्याचे नवाब मलिक यांनी पुराव्यासहीत उघड केले आहे. आज समीर वानखेडे यांचे जन्मप्रमाणपत्र प्रसारीत केले आहे. त्यावरून समीर वानखेडे यांनी मागासवर्गीय असल्याचे दाखवून फायदा मिळवला असल्याचे दिसत आहे असेही पाटील म्हणाले.
