बॉलीवूडकडून खंडणी वसुलीसाठी क्रूझ पार्टी प्रकरण केले काय?
बॉलीवूडकडून खंडणी वसुलीसाठी क्रूझ पार्टी प्रकरण केले काय?
मुंबई, दि. 25 ऑक्टोबर:
एनसीबीच्या क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी अत्यंत गंभीर खुलासे केल्यानंतर एकूण प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एनसीबी आणि समीर वानखेडे यांनी प्रभाकर साईल यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र चोर कधी स्वतःला चोर म्हणवत नाही असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, मुंबईची सिनेसृष्टी ही महाराष्ट्राचे वैभव आहे. त्याला बदनाम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर बोट ठेवले आहे. गुजरातच्या बंदरावर २५ हजार कोटींचे ड्रग्ज पकडले त्याची बातमी होत नाही. नवाब मलिक जे मांडत आहेत हे पाहिल्यावर स्पष्ट दिसते की काहीतरी गडबड आहे. याचे पुरावे आता समोर आले आहेत. बॉलीवूड कलाकाराकडून खंडणी मागण्यासाठी हे क्रूझ पार्टी प्रकरण केले की काय?,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
सगळे व्हिडीओ, पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करावी असे माझे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांनी याचा तपास करण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना करावी.
केंद्रीय तपास यंत्रणांचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावरील तस्करी रोखण्याचे काम आहे. छोट्या प्रमाणात ड्रग्ज पकडायचे आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये जणूकाही फार मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेत आहेत असे दाखवायचे. मुंबईतली सिनेसृष्टी राज्याच्या बाहेर हलवायची आहे यासाठी हे धंदे सुरु आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा देशाच्या असतात राजकीय पक्षाच्या नसतात. भाजपाचे लोक केंद्रीय यंत्रणा त्यांच्या नोकर आहेत अशा तऱ्हेने कारभार करत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
