समीर वानखेडे मागासवर्गीय असल्यामुळे आरोप !
समीर वानखेडे मागासवर्गीय असल्यामुळे आरोप !
मुंबई दि. 25 ऑक्टोबर :
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे आणि खोडसाळ आहेत. नवाब मलिक आमचे मित्र आहेत पण तरीही त्यांनी समीर वानखेडे यांच्या बाबतीत घेतलेली भूमिका ही चुकीची आहे. समीर वानखेडे यांचं चारित्र्यहीन करण्याचं काम नवाब मलिक यांनी थांबावावे. वानखडे हे मागासवर्गीय अधिकारी असून यांच्यावर अशा प्रकारचे आघात होणार असतील तर आम्ही वानखडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.
आठवले पुढे म्हणाले की, समीर वानखडे यांच्या जीवितास धोका होऊ नये, त्यांना राज्य सरकारने संरक्षण द्यावे. समीर वानखडे या कर्तबगार अधिकाऱ्याच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा असा इशाराही आठवले यांनी दिला.
आर्यन खान विरुद्ध सबळ पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे न्यायालयात त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. कारवाई करताना पुरावे नसते तर न्यायालयाने तात्काळ आर्यन खान यांना जमीन दिला असता. याबाबत समीर वानखडे यांनी केलेली कारवाई योग्य आहे. समीर वानखडे यांनी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. ड्रग्सच्या विळख्यातून युवा पिढीला वाचविण्याचे काम नारकोटिक्स विभाग करीत आहे.तेच काम समीर वानखडे करीत आहे. युवा पिढीला ड्रग्सच्या विळख्यातून वाचविण्याचे काम देशहिताचे असून असे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देणे योग्य नसून उलट अशा अधिकाऱ्यांच्या समर्थनासाठी पुढे आले पाहिजे.
मंत्री नवाब मलिक यांच्या जावयावर यापूर्वी समिर वानखडे यांनी कारवाई केली असल्यामुळे त्यांचा राग मनात धरून समीर वानखडे यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी आणि नवाब मलिक यांनी केलेला आहे. त्यासाठी सत्तेचा गैरवापर नवाब मलिक आणि महाविकास आघाडी सरकार करीत आहे.
