महाराष्ट्र तुळशी वृंदावन पण काहींना वाटतं इथं गांजा पिकवू !
महाराष्ट्र तुळशी वृंदावन पण काहींना वाटतं इथं गांजा पिकवू !
नाशिक, दि. २३ ऑक्टोबर :
मुंबईत मागील काही महिन्यांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून बॉलिवूड कलाकारांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. यावर राज्यातील राजकारणही तापले आहे. एनसीबीच्या कारवाया या बोगस असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक यांनी केल्यानंतर शिवसेनाही आता मैदानात उतरली आहे. महाराष्ट्र हे तुळशी वृंदावन आहे, इथे तुळशीचं पीक जास्त आहे. पण काही लोकांना वाटतं की या राज्यात काही गांजा, भांग आपण पिकवू, पण ते शक्य नाही, असा सणसणीत टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स याचे घाव तुम्ही किती करणार आमच्यावर. मी मागे म्हणालो होतो, की यातूनही सरकार पडत नसेल, तर आर्मीला बोलवा. आता आर्मीच राहिली आहे, बाकी सगळं झालंय. उद्धव ठाकरे, शरद पवार, गांधी कुटुंबाचंही तेच म्हणणं आहे की हे सरकार ५ वर्ष टिकेल आणि भविष्यातही आम्ही एकत्र राहून काम केलं, तर २५ वर्ष हे सरकार हलणार नाही”
शाहरुख खानच्या मुलाला ड्रग पार्टीवरून एनसीबीने अटक केल्यानंतर बॉलिवूड, पार्ट्या व एनसीबी पुन्हा चर्चेत आले आहेत. परंतु या चौकशीच्या निमित्ताने बॉलिवूडला बदनाम करण्याचे षडयंत्र चालंल आहे. त्याचाच हा एक भाग असून एनसीबीच्या या कारवायांवरच आता संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.
