एनसीबीच्या कारवाया म्हणजे ‘दाल मे कुछ काला है’!
एनसीबीच्या कारवाया म्हणजे ‘दाल मे कुछ काला है’!
मुंबई, दि. 21 ऑक्टोबर:
एनसीबीने बाॅलिवूडवर धाडी टाकून शाहरूख खानच्या मुलाला अटक केली. याआधीही नामांकित हिरो व हिरोईनवर कारवाई केल्याने एकच खळबळ माजली आहे. एनसीबीच्या कारवायावर आता संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक यांनी अनेक गौप्यस्फोट करून या कारवायाच बोगस असल्याचा आरोप केला आहे. यात आता काँग्रेसनेही
उडी घेतली आहे. मुंबईतील एनसीबीच्या कारवाया म्हणजे ‘दाल मे कुछ काला है…’ असे वाटते, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना पटोले पुढे म्हणाले की, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, जे चुकीचे करतील त्यावर कारवाई झाली पाहिजे. पण अदानी मुंद्रा बंदरावर ३००० हजार किलो अंमली पदार्थ सापडले त्याचे काय झाले ? त्याच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. आपल्या उद्योगपती मित्रांना वाचवण्यासाठी व अदानी मुंद्रा बंदरावर सापडलेल्या अंमलीपदार्थाच्या मोठ्या साठ्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मुंबईत कारवाया केल्याचे दाखवले जात आहे. शाहरुख खानच्या मुलाला एनसीबीने अटक केली त्याला हिंदु मुस्लीम रंग देण्याचा अत्यंत हिन प्रयत्न भाजपाकडून होत असल्याचेही पटोले म्हणाले.
