Ads

-

राज्यात सप्टेंबरमध्ये १७१५० बेरोजगारांना रोजगार

By Xtralarge News

October 13, 2021 11:17 am

Ads

राज्यात सप्टेंबरमध्ये १७१५० बेरोजगारांना रोजगार

मुंबई, दि. 13 ऑक्टोबर :

कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यामध्ये सप्टेंबर २०२१ मध्ये १७ हजार १५० बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो.
अशा विविध उपक्रमामधून मागील वर्षी २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले तर चालू वर्षात जानेवारी ते सप्टेंबरअखेर १ लाख २८ हजार २३३ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरी इच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.  विभागामार्फत जिल्ह्यामध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते असे मंत्री नवाब मलिक म्हणाले.

विभागाकडे, महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९१ हजार ४७६ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरी इच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

सप्टेंबर २०२१ मध्ये विभागाकडे ४६ हजार १५० इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात १२ हजार ५९४, नाशिक विभागात ६ हजार ४४९, पुणे विभागात १२ हजार ८६२, औरंगाबाद विभागात ५ हजार ९८१, अमरावती विभागात २ हजार ९५३ तर नागपूर विभागात ५ हजार ३११ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

सप्टेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १७ हजार १५० उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक १० हजार २०, नाशिक विभागात १ हजार ७६०, पुणे विभागात २ हजार ५०५, औरंगाबाद विभागात २९८, अमरावती विभागात ५२८ तर नागपूर विभागात २ हजार ३९ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

No comments to show.

Leave a Comment