भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले !
भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले !
मुंबई, दि. ६ ऑक्टोबर :
भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले आहे हे या निकालामधून दिसते. यापुढील निवडणुकांमध्येदेखील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूनेच लागेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या निकालात ८५ जागांपैकी जवळपास ४८ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास १९ जागा जिंकल्या असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.
आज राज्यातील ६ जिल्हयांमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मधील पोटनिवडणूकांचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात महाविकास आघाडीने विकास कामातून जनता सोबत असल्याचे सिध्द केले आहे. महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
