राहुरीत रंगली मंत्री मामा भाच्याची जुगलबंदी !
राहुरीत रंगली मंत्री मामा भाच्याची जुगलबंदी !
राहुरी दि. 1 ऑक्टोबर:
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली राष्ट्रवादी काँग्रेसची ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा’ आज राहुरी येथे पोहोचली. पक्षाची आढावा बैठक घेत असताना मंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यात चांगलीच विकासात्मक बाबींवर जुगलबंदी उपस्थितांना पहायला मिळाली
मतदारसंघाचा आढावा देत असताना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मुळा धरणाच्या बॅक वॉटरमुळे विस्थापित झालेल्या गावांना दळणवळणासाठी पुलाची मागणी केली. याबाबत आधीच निर्णय झाला असून या पुलाला नियामक मंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. तसेच जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग ५०-५० टक्के खर्च करून हा पूल पूर्ण करणार आहे अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. यावेळी निळवंडे धरणाच्या कामाच्या प्रगतीची माहिती जयंत पाटील यांनी उपस्थितांना दिली तसेच २०२४ पर्यंत या प्रकल्पाच्या कालव्याची कामे पूर्ण करून या भागातील सिंचन क्षमतेत वाढ केली जाईल असेही त्यांनी आश्वासित केले. तनपुरे यांनी भागडा चारी प्रकल्प व इतर योजनांबाबतही आपली कैफियत मंत्री जयंत पाटील यांच्यासमोर मांडली.
प्राजक्तदादा माझंही तुमच्याकडे काम आहे… तुमच्या मागण्या मान्य केल्या आता आमच्या निधीचाही विचार करा असे म्हणत जयंत पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांना गुगली टाकली. आमच्या इस्लामपूर, आष्टा नगरपालिकेला नगरविकास राज्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली. राहुरी मतदारसंघात जवळपास २०० ट्रान्सफॉर्मर्स बसवले आहेत. आमच्या भागाकडेही लक्ष असूद्या अशी मिश्किली जयंत पाटील यांनी केली. राहुरीतील या ‘परिवार’ संवादात दोन मंत्र्यांमध्ये रंगलेली ही जुंगलबंदी पाहत संपूर्ण सभागृहात हशा पिकला.
