… तर ओबीसी आरक्षण सुरक्षित राहिले नसते
… तर ओबीसी आरक्षण सुरक्षित राहिले नसते
राहुरी दि. 01 ऑक्टोबर:
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचे काम नवा कायदा करून राज्यसरकारने केले आहे. हा कायदा केला नसता तर ओबीसी समाजाचे आरक्षण सुरक्षित राहिले नसते शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सहभाग घेता आला नसता असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राहुरी येथे केले.
राहुरी व पाथर्डीच्या जनतेने प्राजक्त तनपुरे यांना पाठिंबा देऊन एक दैदीप्यमान असा विजय संपादन केला आहे. लोकांच्या हिताच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. त्यामुळे या भागातले प्रश्न सोडवण्याचे काम आता जोमाने सुरू होईल असेही जयंत पाटील म्हणाले.
बुथ कमिट्यांचे काम प्रभावीपणे करा असे सांगताना हारतुरे न घेता तुमच्याशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न परिवार संवाद यात्रेतून केला जात आहे असेही जयंत पाटील म्हणाले. धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोरोना वाढणार नाही याची काळजी घेण्याच्या व तिसरी लाट येऊ नये ही अपेक्षा आहे अशी सूचना जयंत पाटील यांनी केली.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मतदारसंघातील जलसंपदा विभागाच्याअंतर्गत येणाऱ्या विकासकामांना निधी मिळावा व कामे मंजूर करण्याची मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी – पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला. त्याअगोदर भेंडा – नेवासा मतदारसंघाचाही आढावा घेतला.
यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे,राहुरी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, शहराध्यक्ष संतोष आघाव आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
