गांधी हत्येनंतर मिठाया वाटणारे म्हणे गांधींचा विचार पोहोचवणार !
गांधी हत्येनंतर मिठाया वाटणारे म्हणे गांधींचा विचार पोहोचवणार !
मुंबई, दि. 30 सप्टेंबर:
महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर मिठाया वाटणारे म्हणे गांधींचा विचार पोहोचवणार. मुंहमें गांधी बगलमें गोडसे ! हेडगेवार जेलमध्ये जाऊन संघविचाराचाच प्रसार करत होते तोच हा प्रकार आहे. गांधीचा मुखवटा घालून गांधींचा विचार संपवण्याच्या संघाच्या षडयंत्राचा हा भाग आहे. गोडसे स्वयंसेवक होता हे देश विसरणार नाही, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
गांधी जयंतीला गांधी विचार घराघरात पोहचवणार या भाजपाच्या निर्णयावर सावंत यांनी सडकून टीका केली.
सावंत पुढे म्हणाले की, गांधीचे नाव केवळ स्वच्छतेशी न जोडता मनातील द्वेष, तिरस्कार संपवा. गांधींनी मनाची स्वच्छता ही महत्त्वाची मानली होती म्हणून ते देश स्वतंत्र होत असताना नौखालीत होते. गोळवलकर, उपाध्याय यांच्या लिखाणाचे दहन करा. ‘गोली मारो सालोंको’ म्हणणाऱ्यांना व लिंचिंग करणाऱ्यांचा सत्कार करणाऱ्यांना पक्षातून काढा. दंगेखोरांना शासन करा.
गांधी हत्या ही संविधानाची निर्मिती होत होती म्हणून झाली. त्या संविधानाला विरोध करणारे मनुस्मृतीचे समर्थक कोण होते हे देश जाणतो. पाच का पचीस आणि दिमक म्हणणाऱ्यांचा पक्ष तोंडाने महात्मा बोलेल पण वर्षानुवर्षे त्यांना दुष्टात्माच ठरवत आलेला आहे, असेही म्हणत सावंत यांनी भाजपाच्या बेगडी प्रेमाचा बुरखा फाडला.
