निळवंडे कालव्याची कामे २०२४ पर्यंत पूर्ण करू
निळवंडे कालव्याची कामे २०२४ पर्यंत पूर्ण करू
अहमदनगर दि. 30 सप्टेंबर :
२०१४ ते २०१९ याकाळात नगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा निळवंडे धरणाचे काम संथगतीने सुरू होते. महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यानंतर निळवंडे धरणाच्या कामाला प्रचंड गती मिळाली असून २०२४ पर्यंत या प्रकल्पाच्या कालव्याची कामे पूर्ण करून या भागातील सिंचन क्षमतेत वाढ केली जाईल असे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जलसंपदा विभागाची आढावा बैठक मंत्री जयंत पाटील यांनी घेतली. यावेळी जिल्ह्यात सुरू असलेल्या जलसंपदा विभागाच्या कामांच्या प्रगतीचाही आढावा घेतला.
अहमदनगर शहरातून जाणाऱ्या सिना नदीच्या पात्रातील निळ्या व लाल पूररेषेत सुधारणा व्हावी अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. एनजीटीच्या नियमात राहून जलसंपदा विभागाने नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करून निळी व लाल पूररेषेत किती सुधारणा होऊ शकते याचा अभ्यास करून मनपाला कळवण्याच्या सूचनाही दिल्या.
श्रीरामपूर शहरातून जाणारा प्रवरा कालवा बंधिस्त करण्याची मागणी आमदार लहू कानडे यांनी केली. याबाबतचा प्रस्ताव सादर करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली.
अकोले येथे उच्च पातळीच्या कालव्याचे काम सुरू आहे. या कामाला गती देण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केली. या विषयावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. लवकर याबाबत सकारात्मक पावले उचलेली जातील.
कवठे या गावात मुळा नदीचा मुख्य कालवा नेहमीच फुटत असतो त्यामुळे कालव्याची वहन क्षमता कमी होते अशी तक्रार आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
गोदावरीच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली तसेच आढळा प्रकल्पासाठीही निधी मंजूर करण्यात आला.
मुळा धरणाच्या बॅक वॉटरमुळे विस्थापित झालेल्या गावांना दळणवळणासाठी पुलाची मागणी होती. या पुलाला नियामक मंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे तसेच जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग ५०-५० टक्के खर्च करून हा पूल पूर्ण करेल असे आश्वासन दिले.
