दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे पवारांनी दाखवून दिले
दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे पवारांनी दाखवून दिले.
घनसावंगी दि. 28 सप्टेंबर :
दोन वर्षापूर्वी शरद पवारसाहेबांना ईडीची नोटीस आली आणि आजच्या दिवशीच ईडीला आव्हान देत मीच येतो असा इशारा पवारसाहेबांनी दिला आणि राज्य व देशभरातील वातावरण ढवळून निघाले होते. या देशात सूडाचं राजकारण सुरू आहे हाच तो भाग होता. पवार साहेबांचा त्या प्रकरणाशी संबंध नव्हता. जाणीवपूर्वक बदनामी करायची हे कुटील कारस्थान होते. दिल्लीच्या तख्ताने पवारसाहेबांना नमवण्याचा प्रयत्न केला परंतु दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे पवार साहेबांनी दाखवून दिले. ही घटना लोकांच्या मनावर खोलवर बसली की आज महाराष्ट्राच्या सत्तेत आपण आहोत याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करुन दिली.
पवारसाहेबांच्या किमयेने व दूरदृष्टीने राज्यात सरकार स्थापन झाले आणि त्यात राजेश टोपे मंत्री झाले आणि आरोग्य मंत्री म्हणून त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले.
देशात आरोग्याचे चांगले काम न केल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना काढून टाकण्यात आले परंतु महाराष्ट्राचा हा आरोग्यमंत्री जगात कामाने मोठा झाला. मूर्ती लहान पण किर्ती महान असे राजेश टोपे यांचे काम आहे असे गौरवोद्गार जयंत पाटील यांनी काढले.
सरकार आल्यावर संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या कामांना प्राधान्य देता येतो. दिवस हे बदलत असतात. आज आपली सत्ता आली आहे. या नेत्यामुळे तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. त्यांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा पाचवा दिवस असून जालना जिल्हयातील घनसावंगी विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला.
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, वक्ता सेलचे अध्यक्ष प्रदीप सोळंके, जालना जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, माजी आमदार अरविंद चव्हाण, समर्थ साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन उत्तममामा पवार, महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा लहाने, मराठवाडा समन्वयक प्रज्ञाताई खोसरे, घनसावंगी तालुकाध्यक्ष नंदकुमार देशमुख, जालना ग्रामीण अध्यक्षा सीमा देशमुख, महिला तालुकाध्यक्षा वंदना पवार, महिला निरीक्षक वैशाली पाटील, युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
