जम्मू काश्मीर पर्यटन महोत्सव 20 ऑक्टोबरपासून

0
20210915_205513

जम्मू काश्मीर पर्यटन महोत्सव 20 ऑक्टोबरपासून

जम्मू काश्मीर पर्यटकांसाठी शंभर टक्के सुरक्षित

मुंबई, दि. 16 सप्टेंबर :
जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटन महोत्सव येत्या 20 ऑक्टोबरपासून पुढील तीन महिने साजरा केला जाणार असल्याची माहिती जम्मू विभागाचे पर्यटन संचालक विवेकानंद राय यांनी दिली. यात धार्मिक पर्यटनासोबतच हाऊस बोट महोत्सव, सरोवर महोत्सव, केशर महोत्सव आदींचा समावेश आहे.

जम्मू आणि काश्मीर हे पर्यटकांसाठी स्वतःच्या घराइतकेच सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटकांविरुद्धचे गुन्हे शून्य टक्के असून पर्यटकांसाठी जम्मू आणि काश्मीर देशातील सर्वात सुरक्षित ठिकाण असल्याचेविवेकानंद राय यांनी सांगितले.

जम्मू आणि काश्मीरमध्ये 75 नवीन पर्यटन स्थळे निश्चित करण्यात आली असून यातील काही ठिकाणी साहसी खेळांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटन संचालकांनी दिली. जम्मू विभागाचे पर्यटन संचालक विवेकानंद राय आणि काश्मीर विभागाचे पर्यटन संचालक डॉ.जी.एन.ईटटू यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत जम्मू आणि काश्मीरमधील नवीन पर्यटन सुविधांची माहिती दिली. जम्मू आणि काश्मीर हे पर्यटकांसाठी शंभर टक्के सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. ईटटू म्हणाले की जम्मू आणि काश्मीरमध्ये परंपरागत पर्यंतनस्थळांच्या जोडीला नवीन 75 पर्यटन स्थळे निश्चित केली गेली आहेत. ही सर्व पर्यटन स्थळे आजवर दुर्लक्षित राहिली होती, येथे पर्यटकांसाठी सुविधा नव्हत्या.मात्र आता केंद्र सरकारच्या सूचनेनुसार जम्मू आणि काश्मीरच्या नायब राज्यपालांच्या मार्गदर्शनात नवीन पर्यटनस्थळांच्या सुविधांचा विकास सुरू झाला आहे. यात अनेक ठिकाणी साहसी खेळांच्या सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत. तसेच कुटुंबासह पर्यटनास येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. साहसी क्रीडांसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी तंबूतील निवासासह निसर्ग पर्यटनाच्याही व्यवस्था निर्माण केल्या गेल्या आहेत. हिमक्रीडांसाठीही पायाभूत सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत.

 

जम्मू आणि काश्मीरमध्ये पक्षी निरीक्षण, अभयरण्यासह निसर्ग पर्यटनाचे विविध पर्याय उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील सांस्कृतिक वारसा म्हणजे येथील प्राचीन घरे व इमारती हेदेखील पर्यटकांसाठी एक आकर्षण असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील हस्तकला आणि उत्तम अगत्यशीलता या पर्यटकांनी अनुभवण्याच्या गोष्टी आहेत असेही ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरमधील केशराची शेती, फळबागा हेदेखील पाहण्यासारखे आहे असे डॉ.ईटटू यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *