महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे

0
IMG_20210531_214241

महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे

भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांची घणाघाती टीका

रत्नागिरी, 27 ॲागस्ट :

ज्या लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते त्यांच्या पवित्र भूमीतून सांगतो, महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उध्दव ठाकरे हे आहेत, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी रत्नागिरी येथे तोफ डागली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आजपासून रत्नागिरीतून पुन्हा सुरुवात झाली असून रत्नागिरी जिल्हा कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार आशिष शेलार यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी सिंहगर्जना लोकमान्य टिळकांनी केली. त्याच
महाराष्ट्रात आज मुख्यमंत्री फक्त माझं, कुटुंब माझी जबाबदारी हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे, या धोरणाने काम करीत आहेत.

उद्धव ठाकरेंची शिवसेना कोकण विरोधी आहे. त्यावेळी कोकणचे सुपुत्र नारायण राणे मुख्यमंत्री झाले त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी षडयंत्र केले. तर सुरेश प्रभू यांना सुध्दा त्याकाळी अपमानास्पद वागणूक उद्धव ठाकरे यांनी दिली होती. बाकी रामदास कदम यांच्याही बाबतीत तेच झालं, अन्य नावे मी घेत नाही. तर आता नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाले त्यानंतर त्यांना अटक करण्यात आले. कोकणाला काही मिळालं की उद्धव ठाकरे यांच्या पोटात का दुखतं?असा सवाल करत याचा संताप कोकणवासीयांमध्ये आहे. येणाऱ्या काळात कोकणातील जनता हा संताप दाखवून देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

महाराष्ट्रात असहिष्णुतेचे जनक उध्दव ठाकरे हेच आहेत. वडाळ्यातील एका व्यक्तीने सरकार विरोधी लिहीले म्हणून त्याचे सार्वजनिक ठिकाणी केशवपन करण्यात आले. एका निवृत्त नौदलाच्या अधिकाऱ्यांनी एक व्यंगचित्र फाँरर्वड केले म्हणून त्यांचा डोळा फोडण्यात आला तर अभिनेत्री कंगना यांचे
घर तोडण्यात आले. सरकार विरोधात बोलले म्हणून एका संपादकाला घरात घुसून अटक केलं गेलं. महाराष्ट्रात आज जे असहिष्णुतेचे हे वातावरण तयार झालेय त्याचे जनक उद्धव ठाकरे हे आहेत अशा शब्दांत ॲड. शेलार यांनी टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रीमंडळात कोकणाला मोठे स्थान दिले म्हणून जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी ही यात्रा निघाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरिबांसाठी ज्या अनेक योजना आहेत त्या आता घराघरात, गावागावात आपण घेऊन जाऊ या, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *