आघाडी सरकारने शिक्षणाचा खेळखंडोबा केला
आघाडी सरकारने शिक्षणाचा खेळखंडोबा केला
मुंबई दि. १२ ऑगस्ट :
महाविकास आघाडी सरकार शिक्षणाच्याबाबतीत भांबावलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. शिक्षण विभाग जे निर्णय घेते ते शिक्षणमंत्र्यांना माहीत नसतं. शिक्षण मंत्री निर्णय घेतात, पण मुख्यमंत्र्यांना टास्क फोर्सच्या माध्यमातून तो निर्णय बदलावा लागतो. यामुळे विद्यार्थी, पालकांना प्रचंड मानसिक तणाव येत आहे, त्यामुळे सरकारने शिक्षणासंदर्भात योग्य ते निर्णय लवकरात लवकर घ्यावे अशी भूमिका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मांडली आहे.
विद्यार्थ्यांच्या फी माफी संदर्भात सरकार म्हणून निर्णय झाला असताना, त्याबाबत अंमलबजावणी झाली नाही यापेक्षा दुसरे दुर्दैवी नाही. त्यामुळे सरकारचा टास्क फोर्स किंवा इतर विभागात समन्वय नसल्याचे दिसून येते आहे. कोरोना काळात केवळ विद्यार्थी, पालक भरडला जात असुन आज विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कोरोना काळात आर्थिक घडी विस्कळीत झाल्यामुळे फी देण्याची अडचण आहे, शिक्षण कर्मचाऱ्यांना पगार नसल्यामुळे ते आज काम करू शकत नाही. त्यामुळे फी माफीबद्दल योग्य तो निर्णय घेण्यात यावा असे नाही झाले तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ होऊन राज्याची शैक्षणिक गुणवत्ता संपेल अशी टिका दरेकर यांनी केली.
दरेकर म्हणाले की, शिक्षणाविषयाच्या संदर्भात कोणत्याच मुद्द्याच्या बाबतीत सरकारचे धोरण स्पष्ट नसल्याने संस्था चालक अवाजवी शुल्क आकारून पालकांची लुट करत असल्याच्या तक्रारी पालंकाकडुन केल्या जात आहे. त्यामुळे पालक,विद्यार्थी, संस्था आणि तज्ञ मंडळी एकत्रित बसून या सर्व गोष्टींवर विचार करण्याची आवश्यकता आहे. परंतु हे सरकार केवळ घोषणा करत आहे, फी कपात करण्याची घोषणा सरकारकडून केली गेली परंतु ती शिक्षण संस्था चालावी, शाळा सुरू व्हावी यासाठी कोणताही ठोस कार्यक्रम नाही. संकट काळात सर्वसामान्य लोकांना फसवण्याचं काम सरकारने करू नये अशी विनंती दरेकर यांनी केली.
