मुंबईकरांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासास मुभा !
मुंबईकरांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासास मुभा !
मुंबई, दि. 8 ऑगस्ट
मुंबईतील सर्वसामान्य लोकांसाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्या आली आहे. ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल. अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
सोशल मीडियावरून नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोविड काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत.
यासंदर्भात अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. आपणा सर्वास माहीतच आहे की अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे. केंद्र सरकारने देखील आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे.तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास मान्यता देत आहोत.
ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल ॲपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील.
सर्वात महत्वाचं म्हणजे लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल. कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा.
