शिक्षणाशिवाय व्यक्तीमत्व घडू शकत नाही !

0
20201122_110409

शिक्षणाशिवाय व्यक्तीमत्व घडू शकत नाही !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि व्यक्तिमत्व विकास संकल्पना पुस्तकाचे आठवलेंच्या हस्ते प्रकाशन.

मुंबई, दि. 8 ऑगस्ट :
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना विकासाची, प्रगतीची दिशा दाखविली. पिढ्यान पिढ्याच्या दास्यातून मुक्ततेसाठी शीक्षणाचा मार्ग दाखविला. शिक्षणाशिवाय व्यक्तिमत्व घडू शकत नाही असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

चंद्रमणी जाधव यांनी लिहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि व्यक्तिमत्व विकास संकल्पना या पुस्तकाचे प्रकाशन रामदास आठवले यांच्या हस्ते भीम छाया सांस्कृतिक केंद्र कालिना सांताक्रूझ पूर्व येथे करण्यात आले.

यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, गौतम सोनवणे, प्रकाश मोरे, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, पत्रकार रवींद्र आंबेकर, विलास तायडे, शिरीष रामटेके, प्रकाश जाधव, सोना कांबळे, विवेक पवार, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी प्रवीण मोरे विलास तायडे यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे कौतुक रामदास आठवले यांनी केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्व विकासाबाबत काय विचार होते त्याची चर्चा या पुस्तकात केली असून त्यासोबत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र या पुस्तकात आले आहे. हे पुस्तक जगभरातील अभ्यासकांना उपयुक्त ठरणारे असून त्यासाठी इंग्रजी आणि हिंदी भाषेत पुस्तकाचे भाषांतर करणे आवश्यक असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले. लेखकांनी महान व्यक्तीमत्वांचे दंतकथा स्वरूपाचे चरित्र लेखन करण्याची पद्धत बदलून साक्षेपी विश्लेषण करून वस्तुनिष्ठ लेखन केले पाहिजे. त्याची सुरुवात चंद्रमणी जाधव या नवोदित लेखकाने केली आहे असे मत रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि व्यक्तिमत्व विकास संकल्पना हे पुस्तक उत्कृष्ट असून या पुस्तकाच्या लेखनामध्ये चंद्रमणी जाधव यांच्या पत्नी रुपाली जाधव यांनी मोठे योगदान दिल्याचे कौतुक रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश कमलाकर जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *