पूरग्रस्तांना तातडीने मदत वाटपाला सुरुवात करा

0
IMG-20210622-WA0111

पूरग्रस्तांना तातडीने मदत वाटपाला सुरुवात करा.

 

मुंबई दि. २९ जुलै
अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेटची बैठक झाली आणि त्यामध्ये निर्णय घेऊन वाटप सुरू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दिली.

त्या – त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना त्या कामाकरिता जेवढी रक्कम खर्च करावी लागेल ती खर्च करण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आला आहे. निधीची कमतरता भासणार नाही असा विश्वासही अजित पवार यांनी दिला.

काही भागात आजही पूराचे पाणी भरलेले आहे. त्यामुळे पंचनामे करण्यास अडचण निर्माण होत आहे मात्र पाणी कमी झाल्याशिवाय त्या भागातील शेती पिकाची काय अवस्था आहे हे कळू शकणार नाही. त्यामुळे जिथे पाणी ओसरले आहे त्याठिकाणी पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. सर्वांना मदत देण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

राज्यातील राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तिथल्या जिल्हाधिकारी व बाकीच्या टिमला त्यामध्ये प्रांत, चीफ अधिकारी यांना काम करण्यास मुभा द्यावी. वेगवेगळ्या नेत्यांना पाहणी करण्याचा अधिकार आहे पण त्यांना माहिती मिळावी यासाठी नोडल अधिकार्‍यांना नेमण्यात आले अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

व्हीव्हीआयपी, व्हिआयपी गेले तर त्यांच्यामागे लवाजमा फिरत राहतो व कामावर परिणाम होतो त्याकरिता हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

हवामान खात्याने अजूनही रेड आणि ऑरेंज अलर्ट सांगितले आहे. निसर्गातील बदलाचे काही सांगता येत नाही. ग्लोबल वार्मिंगमुळे इथे घडतंय असं नाही. उत्तराखंडमध्येही घडतंय. जगातील चीन, जर्मनी यासारख्या देशातही घडत आहे. अर्थात याबाबत सर्वांनी विचार करावा असेही अजित पवार म्हणाले.

भूगर्भात काही बदल होतायत का? ज्याठिकाणी हे घडलं त्याठिकाणी कोणतंही खोदकाम किंवा वृक्षतोड झालेली नव्हती मग हे का घडलं याचा अभ्यास करण्याकरीता तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *