IMG-20210722-WA0051

आपण या संकटालाही तोंड देऊ…

सांगली, दि. २३ जुलै :
मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील परिस्थिती तीव्र आणि गंभीर होत चालली आहे. प्रशासनाने कालपासूनच सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत मात्र काळजी म्हणून नेहमी संकटात असणाऱ्या गावांनी आपली जनावरे, महत्त्वाच्या वस्तू घेऊन स्थलांतरीत व्हावे असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी जनतेला केले आहे.

आपल्या सर्वांची मोठी आबाळ होईल पण निसर्गापुढे आपण काहीच करू शकत नाही अशी भावनिक खंत मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सांगलीतही परिस्थिती गंभीर होत चालली आहे. लोकप्रतिनिधी, सरपंच, यंत्रणेने ताबडतोब हालचाली कराव्यात. शिवाय तेथील प्रशासनालाही सूचना दिल्या आहेत. जलसंपदा विभाग धरणांच्या पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवून आहे तसेच कर्नाटक सरकारशी संपर्कात आहोत. शिवाय प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या सातत्याने संपर्कात असल्याचा धीरही मंत्री जयंत पाटील यांनी जनतेला दिला आहे.

एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. मात्र पाऊस खुप आहे. त्यामुळे काठावरच्या गावांनी परिस्थिती बिघडण्याच्या आत बाहेर पडावं. पश्चिम महाराष्ट्राने अशी अनेक संकट पाहिली आहेत. आपण या संकटालाही तोंड देऊ असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील २०१९ चा पूर आठवला की अनेकांना झोप लागत नाही. मागच्या काही दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रात त्याच तीव्रतेचा पाऊस पडत आहे आणि पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. मागचा अनुभव लक्षात घेता नागरिकांचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *