ओबीसी आरक्षणाला हात लावाल तर खबरदार!
ओबीसी आरक्षणाला हात लावाल तर खबरदार !
काँग्रेस- राष्ट्रवादीने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी.
मुंबई, दि. 13 डिसेंबर:
राज्यात सध्या मराठा व ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. तर बाहेर राजकीय पक्ष व संघटना आक्रमक झाल्या आहेत. भारतीय जनता पार्टीला ओबीसी कार्यकारिणीतही आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर होता.
या कार्यकारिणीत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की,’ मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच पाहिजे यात काहीही शंका नाही. मात्र ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरुन विरोध करु.
मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही त्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही याचं कलम टाकलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. पण या कलमाला कोणतीही स्थगिती दिली नाही. या कलमाद्वारे आम्ही ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिलं. मात्र ओबीसी आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही.
ओबीसी आरक्षणाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी.
सरकार मधले मंत्रीच मोर्चे काढत आहेत. सरकारमधल्या मंत्र्यांना सरकारविरोधात मोर्चे काढण्याचा अधिकार नाही. बाहेर मोर्चे काढून लोकांना भरकटवलं जातं आहे. त्यापेक्षा ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही असा ठराव मंत्रिमंडळात ठराव आणा, असेही फडणवीस म्हणाले.
आपल्या सरकारने ओबीसी समाजासाठी अनेक योजना राबविल्या. पण आज या सरकारने ओबीसी समाजासाठी पैसा देणे बंद केले आहे. भाजपाचा ओबीसी मोर्चा ही केवळ एक आघाडी नाही, तर शेवटच्या माणसाच्या विकासासाठी कटिबद्ध असा कार्यकर्त्यांचा संच आहे. शेवटच्या माणसाचा विकास झाला तरच देशाचा विकास होतो. म्हणून तुमची जबाबदारी अधिक आहे, असे ही फडणवीस म्हणाले.
