खाद्यपदार्थांच्या गाड्या, चहाच्या टपऱ्या सुरु करण्यास परवानगी द्या !:

0
Ramkisan ojha Congress

मुंबई, दि. २३ जून २०२०

महाविकास आघाडी सरकारने नुकतेच अनलॉक-१ च्या माध्यमातून पुनःश्च हरिओम म्हणत उद्योग, व्यवसाय, दुकाने, आस्थापना, तसेच हॉटेल, होम डिलिव्हरी यासारख्या छोट्या मोठ्या उद्योगांना अटी, शर्थी घालून व्यवसाय करण्यास परवानगी देण्याचा स्तुत्य निर्णय घेतलेला आहे. याच धर्तीवर शासनाने खाद्यपदार्थांची छोटी दुकाने, गाड्या, चहाच्या टपऱ्या सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामकिशन ओझा यांनी केली आहे.

ओझा यांनी याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात ते असे म्हणतात की, चहाच्या टपऱ्या, छोट्या गाड्यांच्या माध्यमातून खाद्यपदार्थ विकून पोट भरणाऱ्यांची संख्या राज्यात लाखोंच्या घरात आहे. लॉकडाऊनमुळे या छोट्या टपरी, गाड्या चालवणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या घटकालाही सोशल डिस्टन्स पाळणे, मास्क लावणे, तसेच गाडे, टपरीच्या आसपासचा परिसर स्वच्छ व निर्जंतूक ठेवणे, अशा अटी शर्थींसह परवानगी दिल्यास त्यांच्या हातात चार पैसे येऊन घर चालवण्यास मदतच होईल. या छोट्या व्यवसायाला परवानगी दिल्यास कामासाठी बाहेर पडलेल्या लोकांचीही सोय होण्यास मदतच होईल.

कोरोना महामारीमुळे सर्वात जास्त भरडला गेला तो हातावर पोट असणारा कामगार. त्याचा रोजगारच हिरावला गेल्यामुळे तीन महिन्यांपासून त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. या संकट काळात काँग्रेस पक्ष तसेच महाविकास आघाडी सरकारने गरीब, कामगार, वंचित घटकाला यथाशक्ती मदतीचा हात दिलेला आहे. आताही या छोट्या व्यावसायिकांना परवानगी देऊन त्यांच्या व्यवसायाचा पुनःश्च हरिओम करण्यास परवानगी देऊन न्याय द्यावा, असे ओझा म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *