मुंबई अहमदाबाद १८ विमानसेवा आणि महाराष्ट्रात फक्त १५ ?
मुंबई अहमदाबाद १८ विमानसेवा आणि महाराष्ट्रात फक्त १५ ?
मुंबई, दि. २२ जुलै ;
मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी रोज १८ विमानसेवा उपलब्ध आहेत. मात्र, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात प्रवास करण्यासाठी सर्व मिळून जेमतेम १५ विमानसेवा का? असा सवाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत चर्चेवेळी उपस्थित केला.
विमान सेवेतील भेदभाव उघड करत चव्हाण म्हणाले की, मुंबईहून अहमदाबादसाठी १ हजार ९९१ रूपये इतक्या स्वस्त दरात विमानाचे तिकीट उपलब्ध होते. मात्र त्यापेक्षा कमी अंतर व प्रवासाचा कमी कालावधी असलेल्या औरंगाबादचे सर्वात स्वस्त भाडे ३ हजार ८४ रूपये तर कसे? अंतर व प्रवासाचा कालावधी जवळपास सारखेच असलेल्या नागपूरचे विमान तिकीट किमान ३ हजार ४०८ रूपये आहे.
राज्यात जेमतेम ११ विमानतळे वापरण्यायोग्य असून, त्यांपैकी अनेक विमानतळांवर नियमित विमानसेवा ठप्प आहे. याबाबत मी केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. त्यांचा प्रतिसाद सकारात्मक राहिला असून, ‘उडाण’ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील विविध विमानसेवा सुरू करण्यासाठी अनेक विमान कंपन्यांनी बोली लावली आहे. मात्र, अनेक प्रमुख शहरातील विमानतळेच बंद असतील तर विमानसेवा कशी सुरू होणार? महाराष्ट्राच्या सर्व विभागात किमान एक-दोन शहरात तरी विमानसेवा सुरू असायला हवी. नांदेडसह राज्यातील अनेक विमानतळांचे संचालन करणारी रिलायन्स कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने नांदेड टर्मिनलवर साधा झाडू मारायला कोणी नाही, धावपट्ट्या खराब होत आहेत, नाईटलँडिंग बंद पडली आहे, डीजीसीएसारख्या संबंधित यंत्रणांना देय असलेले शुल्क देखील रिलायन्सकडे थकित झाले आहे.
