बोगस मच्छिमार सोसायट्यांवर कारवाई करा!
अकोला, दि. ६ जुलै २०२०
बारा बलुतेदारांच्या प्रश्नांकडे कोणीही लक्ष दिले नसून लॉकडाऊनमध्ये कुंभार व नाभिक समाजाच्या प्रश्नांसाठी वंचितला जोरदार लढा द्यावा लागला त्यानंतर प्रशासन जागे झाले. आता मच्छीमारांचा प्रश्न बिकट झाला असून मच्छीमार, कोळी बांधव नसलेल्या बोगस सोसायट्यांना मच्छिमारी करण्याचे ठेके दिले जात आहेत. त्यात सुधारणा करून वर्षानुवर्षे, परंपरागत मच्छीमारी करीत आलेले आहेत अशा मच्छिमार बांधवांनाच ठेका देण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
राज्यात असलेले तलाव, बंधारा किंवा नदीकाठचा भाग हा ठेके पद्धतीने मच्छिमार बांधवांना मच्छीमारीसाठी दिला जातो. मात्र गेल्या काही वर्षात मच्छिमारी व्यवसायाचा ज्याचा काडीमात्र संबंध नाही असे लोक बोगस सोसायट्या तयार करतात व प्रशासनाकडून मच्छीमारीचा ठेका घेतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने मच्छिमारी व्यवसाय करणाऱ्या कोळी बांधवांवर अन्याय होत आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा बोगस लोकांचा ठेका बंद करून खऱ्या कोळी बांधवांना मच्छिमारी करण्यासाठी ठेके द्यावेत.कोळी बांधवांच्या प्रश्नांचा प्रशासन गांभीर्याने विचार करेल, अशी अपेक्षाही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.
